शरद पवार यांच्या हस्ते विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय इमारतीचे उद्घाटन

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन (राकेश बोरा) – रयत शिक्षण संस्थेचे हे वटवृक्षाचे रोपटे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लावले. त्याला खतपाणी घालण्याचे काम आपले आहे. विद्येच्या जोरावर राज्यकर्ते चांगले निर्णय घेतील यासाठी कर्मवीर दादांनी शिक्षणाचे हे काम सुरू केले. या जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात अनेक लोकांनी कामे केली त्यात कर्मवीर भाऊसाहेब हिरे, वसंतराव नाईक यांनी शिक्षणाचे रोपटे लावले. त्याचा आज वटवृक्ष झाला आहे. हे शैक्षणिक जाळे निर्माण होण्यात महात्मा जोतीराव फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचार असल्याचे देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार सांगितले. विंचूर येथील कर्मवीर भावराव पाटील विद्यालय व कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय विंचूर येथील नवीन इमारतीच्या उदघाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

शिक्षणामुळे घरे बदलली, सुधारणा झाली. त्यामुळे सबंध घराचे चित्र बदललं याचं कारण मुली शिक्षित झाल्या त्याचा हा परिणाम आहे. महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाची बीजे रोवली त्यामुळे समाजातील गोर गरीब शिक्षित झाला असल्याचेही शरद पवार यावेळी म्हणाले.

यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री विनायक दादा पाटील, आमदार हेमंत टकले, डॉ. अनिल पाटील, ऍड. भगीरथ शिंदे, विभागीय अध्यक्ष दादाभाऊ कळमकर, रामशेठ ठाकूर, सुनील मालपाणी, नारायणी गुरुजी, बाळकिसन मालपाणी, डॉ.भाऊसाहेब कराळे, माजी खासदार समीर भुजबळ, ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, चांगदेव होळकर, अंबादास बनकर, आमदार दिलीप बनकर, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवळ, किशोर दराडे, माजी आमदार जयवंतराव जाधव, जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पगार, कोंडाजी मामा आव्हाड, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सयाजीराव गायकवाड, लासलगाव बाजार समितीचे माजी अध्यक्ष जयदत्त होळकर, जिल्हा परिषद सभापती संजय बनकर, जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार, जगदीश जेऊघाले, रवींद्र पवार, संजय नागपुरे, राजेंद्र फाळके, पंढरीनाथ दरेकर, अनिल दरेकर, पंढरीनाथ थोरे, राजेंद्र डोखळे, काकासाहेब गुंजाळ, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, सचिन पिंगळे, कैलास सोनवणे, ललित दरेकर, सरपंच वंदना कानडे, प्राचार्य देवरे सर, यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी बांधव उपस्थित होते.

नाशिक जिल्हा कृषिवर आधारित जिल्हा असून द्राक्ष, डाळिंब यासह अनेक पिके आज सुधारित पद्धतीने घेतल्याने उत्पादन वाढले आहे. हा जिल्हा जसा अनेक दृष्टीने पुढे जातो आहे तसेच शिक्षणातही हा जिल्हा आपले नाव लौकिक मिळविल्याशिवाय राहणार नाही. या सर्वांच्या मागे कर्मवीरांचे विचार आहे ते यापुढील काळातही रुजविण्याची आपली जबाबदारी आहे. विज्ञानाचा आधार घेऊन कौशल्य विकासाचे शिक्षण घेऊन आपले घर चालवावे. साचेबंद शिकणासोबत आता कौशल्यावर आधारित शिक्षण घेण्याची गरज आहे. साचेबंद शिक्षणाला कौशल्य विकासाची जोड देण्याची आवश्यकता आहे. वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान घेण्यासाठी रयत शिक्षण संस्थेने काम करावे आणि यासाठी पालकांनी आणि शिक्षकांनी देखील लक्ष घालून विद्यार्थ्यांशी शिक्षणातील गोडी अधिक वृद्धिंगत करावी असे आवाहन पवार यांनी केले.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासह तत्कालीन समाज सेवकांनी शिक्षणाची जबाबदारी घेतल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षित झाले. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारखे समाज सुधारक हे आपले दैवत असून त्यांची पूजा करावी असे आवाहन त्यांनी केले. याचे बीज शालेय स्तरावरून रुजवावे असे त्यांनी सांगितले. पालखेड डावा कालवा येथील काँक्रीटकरण तसेच नाशिक-येवला रस्त्याचे चौपदरीकरण संपूर्ण काँक्रीटीकरण केले जाईल असे त्यांनी यावे स्पष्ट केले. गेल्या पाच वर्षात शैक्षणिक क्षेत्रात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम शरद पवार करतात तेच जाणता राजा आहे असे त्यांनी सांगितले.

राज्यकर्त्यांनी कुठलीही टीका टिपणी करून वाद करण्यापेक्षा संक्रांतीनिमित्त ‘तीळ गूळ घ्या गोड गोड बोला’ आणि जनतेची काम करा असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी माजी मंत्री विनायकदादा पाटील, अनिल पाटील, ऍड. भगीरथ शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/