‘राज्यात शरद पवार यांच्या एवढा जाणकार नेता नाही, मात्र ते सध्या ठाकरे सरकारच्या सोईसाठी मोजकंच बोलताहेत’

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – आपत्तीच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारची मदत करण्याची क्षमता आणि नियम हे सर्व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना नेमके चांंगले ठाऊक आहे. परंतु, सध्या त्यांच्यावर राज्य सरकारचा बचाव करण्याची जबाबदारी येऊन पडली आहे. त्यामुळे पवार सध्या सरकारच्या सोईसाठी मोजकंच बोलत असून त्यांच्याइतका राज्यात जाणकार नेता नसल्याची टिप्पणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

फडणवीस हे सध्या राज्यातील अतिवृष्टी झालेल्या भागांचा दौरा करत आहेत. मंगळवारी उस्मानाबाद जिल्हयाच्या दौऱ्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने कर्ज काढण्याच्या शरद पवार यांच्या निर्णयाचे समर्थन केले. कर्ज काढतोय म्हणजे आपण काही पाप करतो असे नव्हे. अर्थसंकल्पातील तरतुदी पूर्ण करण्यासाठी सरकार नेहमीच कर्ज काढते. नंतर त्याची परतफेड करते. संकटाच्या काळात सरकारला कर्ज घ्यावेच लागते. रिझर्व्ह बँकेने नव्याने आखून दिलेल्या मर्यादेनुसार राज्याला 1 लाख 20 हजार कोटी रुपयांचे कर्ज काढण्याची मुभा आहे.

आतापर्यंत महाराष्ट्राने आपण केवळ 60 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. त्यामुळे राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सहज कर्ज काढू शकते असे ते म्हणाले. तसेच फडणवीस यांनी केंद्र सरकारने मदत द्यावी, अशी मागणी करणाऱ्या महाविकासआघाडीच्या नेत्यांनाही फटकारले. एरवी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये बरेच मतभेद आहेत.

मात्र, केंद्राने मदत द्यावी, या मुद्द्यावर तिन्ही पक्ष एकमताने बोलतात. एकूणच तिन्ही पक्ष हात झटकण्यात तरबेज आहेत. राज्यात अतिवृष्टी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:हून उद्धव ठाकरे यांना फोन करुन आम्ही तुमच्यासोबत असल्याचे सांगितल्याची आठवणही त्यांनी करून दिली.

पवारांच्या आत्मचरित्रातही कृषी विधेयकांचे समर्थन
शरद पवार यांनी तुळजापूर येथील पत्रकारपरिषदेत शेतकरी कृषी कायद्याला घाबरत असल्याचे विधान केले होते. यावर फडणवीस यांनी कृषी कायदा ही पवार केंद्रात सत्तेत असतानाचीच कल्पना असल्याचे सांगितले. त्यांच्याच सरकारने ही कल्पना मांडली होती. पवार यांनी आपल्या आत्मचरित्रातही कृषी कायदा कशाप्रकारे योग्य आहे, हे सांगितल्याची आठवण फडणवीस यांनी करुन दिली.