फडणवीस अन् चंद्रकांतदादा यांच्याशिवाय राज्यात इतरही विषय आहेत, जलसंपदा मंत्री जयंत पाटलांनी दिले माध्यमांना उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या धक्क्यातून आता सरकार हळूहळू सावरत आहे. महाविकास आघाडी सरकार आता पूर्ण गतीने कामाला लागले आहे. पण मला मात्र सगळीकडे गेल्यावर पत्रकार मंडळी केवळ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यांबद्दलचे प्रश्न विचारतात. पण यावर मी म्हणेन की फडणवीस आणि पाटील यांच्याशिवाय राज्यात अनेक विषय आहेत. आम्ही राज्याच्या महत्त्वाच्या विषयांना प्राधान्य देण्याचे ठरवले असल्याचे उत्तर राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांना दिले आहे.

पुणे बंगळुरू महामार्गावर जोशीविहीर (ता. वाई) येथे सातारा जिल्हा बँकेच्या एटीएम सेंटरचे उद्घाटन शनिवारी (दि. 2) जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. पाटील म्हणाले की, चंद्रकांत पाटील हे वर्तमानपत्रात छापण्यात येणाऱ्या बातम्यांच्या भाषेसंदर्भात संपादकांना पत्र लिहून आक्षेप कळवणार असल्याचं मी ऐकल होते. ते नक्की कोणत्या मुद्द्याबाबत बोलत आहेत हेच मला माहिती नाही. त्यांचा मूळ मुद्दाच मला माहीती नसल्याने त्यावर मी काही बोलणार नाही. त्यांच्याविषयी लिहिलेल मी काहीही वाचलेलं नाही. कारण मी त्याच्या विषयापुरत सीमित राहू इच्छित नाही, असे म्हणत त्यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.

चंद्रकांतदादांना विश्रांतीची गरज !
चंद्रकांत पाटील सध्या पुणे, कोल्हापूर या राजकारणात अडकून पडले आहेत. या विषयीच्या चर्चेत राहून त्यांनी स्वतःला सीमित करून घेतले आहे. रोज काही ना काही बोलून स्वत:ला चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे. त्यांना आता खऱ्या अर्थाने विश्रांतीची गरज असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणा संदर्भात मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे यांच्याविषयी जे पुरावे मिळतील त्यामुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल. पण कारवाई कशा स्वरूपाची असेल? हे केवळ त्या विभागाचे मंत्रीच सांगू शकतील, असे त्यांनी नमूद केले.