शरद पवारांनी सोनिया गांधींची घेतली भेट, सत्ता स्थापनेचा ‘ठोस’ निर्णय नाहीच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रातील सत्ता स्थापनानेचा तिढा अद्याप मिटलेला नसून सत्ता स्थापनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षामध्ये चर्चा आणि बैठकांचे सत्र सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. 45 मिनीटे झालेल्या या बैठकीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवणार असल्याचे सांगत सत्ता स्थापनेबाबत सोनिया गांधी यांच्याबाबत चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

शरद पवार – सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर शरद पवार यांनी पत्राकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत चर्चा झाली नसल्याचे सांगितले. तसेच आघाडीतल्या मित्र पक्षांमध्ये नाराजी असल्याचे सांगत त्यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत कोणतेही वक्तव्य केले नाही. त्यामुळे राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याची चिन्ह दिसत नाहीत.

विधानसभा निवडणूक निकालात भाजपा-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळालं. मात्र, शिवसेनेनं स्वतंत्र भूमिका घेतल्यानं राज्यात त्रिशंकू अवस्था निर्माण झाली. भाजपा, राष्ट्रवादीनं सरकार स्थापन करण्यास असमर्थता दर्शवली. तर शिवसेनेनं सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी वेळ वाढवून मागितला होता. राज्यपालांनी अधिक वेळ देण्यास नकार देत राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असून, सत्ता कधी स्थापन होणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागले आहे.

Visit : Policenama.com