कावळ्यांची नव्हे मावळ्यांची ‘चिंता’ : शरद पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज अनेक लोक पक्ष सोडत आहेत. मात्र, जे लोक खटल्यात अडकले आहेत त्यांच्यावर राज्यकर्ते दबाव आणत आहेत. त्यामुळे पक्षगळती होत आहे. आपण पूर्ण स्वच्छ आहात तर आपल्याला कसलीही चिंता नाही. आता कावळ्यांची चिंता करायची नाही तर मावळ्यांची चिंता करावी, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्यांवर टीका केली. आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीला उपस्थित राहून त्यांनी महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी पक्षाला लागलेल्या गळतीवर बोलत होते.

सरकारवर टीका करताना शरद पवार म्हणाले, महिलांवरील अत्याचार आणि विकृत मनस्थितीवर जरब बसवण्याची यंत्रणा ढिसाळ झाली आहे. राज्यकर्त्यांना महिलांना सन्मानाची वागणूक देता येत नाही ते कशी यंत्रणा चालवणार असे म्हणत त्यांनी सत्ताधारी भाजपावर टीका केली. पुढे बोलताना म्हणाले, निवडणुकांना सामोरे जाताना तरुणांना आणि महिलांना पुढाकार देण्याचे काम पक्षाने केले पाहिजे, असा माझा आग्रह आहे. नवीन चेहऱ्यांना समोर आणण्यासाठी पक्षाच्या वतीने विचार केला पाहिजे.

महाराष्ट्राची दुसरी रजधानी नागपूर हे आज गुन्हेगारांचे केंद्र बनले आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देखील तिथलेच आहेत. या साऱ्यांविरोधात आवाज उठवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांमध्ये आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या बैठकीत आज महिला कार्यकर्त्यांचा उत्तम निर्धार जाणवला असल्याचे ते म्हणाले.

आरोग्यविषयक वृत्त –