शरद पवारांनी ठाकरे सरकारकडून व्यक्त केली ‘ही’ एकच अपेक्षा

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – बेळगाव सीमाप्रश्नी लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्यांना अभिवादन करण्यासाठी राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर गेले असता, शुक्रवारी सकाळी बेळगाव पोलिसांनी त्यांना अटक केली. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही बेळगाव पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याचा आपला अनुभव सांगत बेळगावातील मराठी लोकांसोबत कायम उभे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

नाशिकच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. ते म्हणाले कि, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि कारखान्यासंदर्भात चर्चा सुरू असून त्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. तसेच चीन सरकार प्रतिनिधी आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची मी एकत्रित बैठक करून दिली असून द्राक्ष चीनला निर्यात करण्यासाठी प्रयत्न असल्याचेही पवार यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील 85 टक्के शेतकरी 2 लाख कर्जमर्यादेच्या आत आहेत. आता याच शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल. उर्वरित शेतकऱ्यांचा विचार येत्या अंदाजपत्रकात केला जाईल, असेही पवार म्हणाले. तसेच, दिल्ली येथे मंत्री पियुष गोयल यांचीदेखील भेट घेणार असून कांदा साठा धोरण आणि निर्यातबंदी रद्द करण्याची मागणी करणार असल्याचेही पवारांनी सांगितले.

दरम्यान, मी नाशिकमधूनच विधानसभा निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. राज्यात सर्वांनाचं बदल हवा होता, युवकांची देखील तीच भूमिका असल्याने आम्हाला त्या गोष्टीचा फायदा झाला. हे तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार बनविताना आम्ही काही निर्णय घेतले. यात युवकांना रोजगार, औद्योगिक धोरण ठरवलं, शेती पुनर्बांधणी धोरण ठरवलं. त्यामुळे या सरकारनं सत्तेचा योग्य वापर करावा, अशी अपेक्षा पवारांनी या सरकारकडून व्यक्त केली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/