‘जिंकलो नसलो तरी मी अजून हरलो नाही’ शरद पवारांची कार्यकर्त्यांना भावनिक साद 

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड पराभवानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकली आहे. निकालानंतर शरद पवारांनी इन्स्टाग्रामवर ‘जिंकलो नसलो तरी हरलो नाही’ या आशयाची पोस्ट टाकून कार्यकर्त्यांना न खचण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे आता कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण करण्यासाठी शरद पवारांनी हि पोस्ट टाकल्याची चर्चा होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला बारामती लोकसभा मतदारसंघ जरी राष्ट्रवादीला राखता आला असला तरी बाकीच्या ठिकाणी त्यांचा पराभव झालेला आहे. कांचन कुल यांचा या ठिकाणी पराभव झालेला असला तरी त्यांनी टक्कर दिली आहे. त्याचबरोबर पार्थ पवार यांच्या रूपाने मावळमध्ये पवार घराण्यात पहिला पराभव देखील बघितला. त्यामुळे  खचलेल्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी  शरद पवार अशा प्रकारे काम करत आहेत. सुप्रिया सुळे यावेळी लोकसभा निवडणुकीत नक्की हरणार, असा दावा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यासाठी सर्व भाजपच्या नेत्यांनी जोरदेखील लावला होता.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी जोर लावला होता. मात्र तरीदेखील सुप्रिया सुळे या ठिकाणी एक लाखापेक्षा जास्त मताधिक्याने  निवडून आल्या आहेत. त्यामुळे आता शरद पवार यांच्या या पोस्टमुळे कार्यकर्त्यांत काय नवचैतन्य पसरते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.