नक्की काय आहे पवार-विखे पाटील वाद ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- पुणे येथे सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभेतून माघार घेतल्याचे जाहीर केले. सध्या सुजय विखे यांच्या उमेदवारीवरून राजकारणात मोठ्या चर्चा रंगताना दिसत आहेत. यावेळी बोलताना पवारांनी “सर्वोच्च न्यायालयाचा तो खटला आठवत असेल,” असं म्हणत विखे पाटलांच्या संघर्षांची आठवण करून दिली.

याबाबत बोलताना अहमदनगरच्या जागेबाबत शरद पवार म्हणाले की, “या ठिकाणी राष्ट्रवादीचेच उमेदवार उभे राहतील. यात निवडून येण्याचा वाद नाही. याच मतदारसंघामध्ये विखे म्हणजे बाळासाहेब विखे हयात नाहीत, त्यांचा पराभव आम्ही लोकांनीच केला होता. त्यावेळी निवडणुकीची जबाबदारी माझ्यावरच होती आणि त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी माझ्यावर केसही केलेली होती. त्यामध्ये माझा कॉन्स्टिट्यूशनल राईट्ससुद्धा रद्द केला होता. शेवटी सुप्रीम कोर्टात मला न्याय मिळाला. त्यामुळे ही सीट आम्ही जिंकू शकतो. ती जागा काँग्रेसकडे असतानाही विजय झाला नाही हा सुद्धा इतिहास आहे.”

काय आहे पवार-विखे यांचा वाद
पवार कुटुंब आणि विखेंचा तब्बल पन्नास वर्षांपेक्षा जास्त जुना संबंध आहे. हा वाद आहे शरद पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील यांच्यातला. हा वाद सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला होता.

शरद पवार आणि बाळासाहेब विखे पाटील यांच्यात अनेक वर्षांपासून संघर्ष चालत आला होता आणि त्यांच्यात दोन गट होते. पण 1991 च्या लोकसभा निवडणुकीत हा वाद खऱ्या अर्थाने पेटला. या निवडणुकीत नगर दक्षिणची जागा बाळासाहेब विखेंना टाळून काँग्रेसने यशवंतराव गडाख यांना दिली होती. अर्थात शरद पवारांनीच ही जागा गडाखांना मिळावी यासाठी जोर लावल्याचं बोललं जातं. बाळासाहेब विखे पाटील अपक्ष म्हणून निवडणूक लढले. या निवडणुकीत बाळासाहेब विखेंचा पराभव झाला. पण स्वतःच्याच जिल्ह्यात झालेला हा पराभव बाळासाहेब विखेंच्या जिव्हारी लागला होता.

बाळासाहेब विखेंनी आचारसंहितेचा धागा पकडत विजयी उमेदवार यशवंतराव गडाख यांच्याविरोधात तक्रार केली. या निवडणुकीत जात आणि धर्माच्या आधारावर मतं मागितली गेल्याचा त्यांनी आरोप केला. बाळासाहेब विखेंनी या प्रकरणी पुरावे जमा केले, प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आणि आरोपी होते यशवंतराव गडाख, तर सहआरोपी म्हणून शरद पवारांचं नाव होतं. शरद पवार या प्रकरणातून यशस्वीरित्या बाहेरही पडले होते.

पवार -विखे पाटील वाद संपुष्टात येणार ?
बाळासाहेब विखे आणि शरद पवार यांच्यातला वाद उभ्या महाराष्ट्राला परिचित असला तरी हा वाद मात्र दुसऱ्या पिढीतही सुरु आहे. राधाकृष्ण विखे पाटील आणि शरद पवार यांच्यातही फार सौख्य नाही. सुजयला नातू समजून पवारांनी जागा सोडावी, असं विखे पाटील म्हणाले होते. पण ही जागा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.

पुन्हा एकदा 1991 सारखी लढत ?
नगर दक्षिणेत राष्ट्रवादीकडून प्रशांत गडाख यांच्या नावाची चर्चा आहे. शरद पवारांनी गडाख अस्त्र बाहेर काढल्याची चर्चा आहे. जर प्रशांत गडाख यांना उमेदवारी मिळाली, तर विखे विरुद्ध गडाख लढाईची पुनरावृत्ती पाहायला मिळू शकते. कारण यशवंतराव गडाखांनी स्वर्गीय बाळासाहेब विखेंचा पराभव केला होता. 1991- च्या लोकसभा निवडणुकीत विखे गडाख खटला देशभरात गाजला होता. हा वाद प्रत्येक राजकारणात पाहायला मिळाला. त्यानंतर शरद पवार आणि विखे पाटील घराण्यात हा वाद आला. जर सुजय विखेंनी इथे लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आणि राष्ट्रवादीने प्रशांत गडाख यांना उमेदवारी दिली तर हा वाद आणखी ताणणार यात शंका नाही.