आधी वाटत होतं निवडणूक अवघड आहे, पण आता यश आपलंच : शरद पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असली तरी त्यांनी आघाडीच्या उमेदवरांना निवडून आणण्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी प्रचाराला सुरुवात केली आहे. पुण्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना जोमाने काम करण्याचे आवाहन केले आहे.

शरद पवार यांनी ट्विटरवरुनही यंदाच्या निवडणुकीत विजय आपलाच आहे, याची खात्री असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले, मी आठ जिल्ह्यात जाऊन आलो. आधी वाटत होत निवडणूक अवघड आहे, पण आता यश आपलेच असल्याची खात्री झाली आहे. कार्यकर्त्यांनी जोमाने काम करा असे ट्विट केले आहे.

पुणे जिल्ह्यातील चारही जागा आपण जिंकणार आहोत, यामध्ये शंका नाही. पुण्याची निवडणूक नेहमीच चर्चेत असते. कारण देशाला दिशा देणारा हा मतदारसंघ असल्याचे शरद पवार म्हणाले. तसेच सत्ताधारी भाजपवर टीका करताना म्हणाले, सत्ताधारी पक्षाकडे सांगण्यासारखे काहीच नाही. त्यांच्याकडे फक्त पैसे आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांना तुम्ही सांगा, परत पैसे मिळणार नाहीत, उगाच आता मिळालेले पैसे खर्च करू नका, असेही शरद पवार यांनी सांगितले.