शरद पवारांचे महाराष्ट्रात ‘जय महाराष्ट्र’ आणि कोलकात्यात ‘जय बांगला’

कोलकाता : वृत्तसंस्था- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारविरोधात कोलकात्यात मेगारॅलीचे आयोजन केले होते. त्यात देशातील मोठ्या नेत्यांनी उपस्थिती लावली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रॅलीला संबोधित केले. त्यावेळी ममता बॅनर्जी यांनी सर्व विरोधी पक्षांना एकत्रित केल्याबद्दल शरद पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. मात्र पवार यांनी आपल्या भाषणाचा शेवट काही वेगळाच केला.

विरोधीपक्षांना संघटीत करण्याचे काम ममताजींनी केलं, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मोदी सरकारच्या काळात आंबेडकरांनी बनवलेल्या संविधानावर हल्ला करण्याचा प्रयत्न होत आहे. आम्ही देशाला वाचवण्यासाठी एकत्र आलो आहे. शेतकरी आज आत्महत्या करतोय. घटनात्मक संस्थांना धोका निर्माण झाला आहे. जनतेची फसवणूक झाली आहे. देशाला बदल हवा आहे. भाजपवाल्यांना वाटतं आम्ही पंतप्रधानपदासाठी वाद घालू. मात्र,आम्ही इथे पदासाठी लढत नाही तर मोदी सरकारला सत्तेतून घालवण्यासाठी एकत्र आलो आहे, असं पवार यांनी म्हटलं.

मोदी सरकारने नोटाबंदी आणि जीएसटी आणली. मात्र त्यामुळे जनतेला प्रचंड त्रासच झाला. उद्योग बंद होत आहेत, बेरोजगारी वाढत आहे. ही परिस्थिती ज्यांनी निर्माण केली,ते सरकार उलथून टाकण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सर्वांची आहे, असंही शरद पवार यांनी म्हटलं.

आम्ही आपल्याला आश्वासन देतो की,आम्ही तुमच्या हक्काचं रक्षण करु, आम्ही एकत्र राहून तुमच्या हक्काचं रक्षण करु. मोदी सरकार बदलण्यासाठी सर्वजण मेहनत घेऊ. आपल्या सर्वांच्या साथीने देशात नवं सरकार आणू. लोकांच्या हिताचं रक्षण करु, हे सांगून मी आपली रजा घेतो, ‘जय हिंद जय बांगला, असा काहीसा वेगळा शेवट पवार यांनी केला.

दरम्यान, या मेगारॅलीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस खासदार मल्लिकार्जुन खर्गे, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, गुजरातमधील पाटिदार नेते हार्दिक पटेल, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासह अनेक प्रमुख विरोधी पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती.