आईच्या आठवणीने शरद पवार भारावले ; पत्र लिहिताना भावना दाटून आल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP chief Sharad Pawar) यांनी त्यांच्या मातोश्री शारदाबाई पवार (Shardabai Pawar ) यांच्या आठवणीत एक पत्र (sharad-pawar-was-overwhelmed-memory-his-mother-when-wrote-letter) लिहिले आहे. हे पत्र खुद्द शरद पवार यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुकवर पोस्ट केले आहे. शारदाबाई पवार या सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्या होत्या. कठोर परिश्रम, प्रामाणिक व्यवहार आणि सामाजिक बांधिलकी हे शारदाबाईंचे जीवनसूत्र होते, दिवाळीच्या निमित्ताने शरद पवार आईच्या आठवणीने भारावलेले दिसून आले. त्यांनी आपल्या दैनंदिन व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून हे पत्र आपल्या आईसाठी लिहिले आहे. वाचा शरद पवारांनी लिहिलेले पत्र जसेच्या तसे.

प्रिय सौ. बाई
साष्टांग नमस्कार,
पत्रास उशीर झाला म्हणून क्षमस्व ! मागील वर्ष खूप धकाधकीचे गेले. एप्रिल-मे महिन्यांत लोकसभेच्या निवडणुका आणि पाठोपाठ राज्याच्या विधानसभा निवडणुका यामुळे सगळे वातावरण ढवळून निघाले होते. लोकसभा निवडणुकीत संयुक्त पुरोगामी आघाडीला यश मिळाले नाही. पक्ष अडचणीत असताना काही जवळचे, काही ज्येष्ठ सहकारीदेखील सोडून गेले. काही महिन्यांतच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्याचे मोठं आव्हान पक्षासमोर उभ होते. पण तुम्ही मला हार न मानता, खचून न जाता झुंजण्याचं बाळकडू दिले आहे. मग खचून जाण्याचा प्रহनच नव्हता.

मला चांगल आठवतंय. बैलाने मारल्यामुळे तुमचा एक पाय अधू झाला. पण तुम्ही नेटाने संसार केला आणि सार्वजनिक कामातदेखील झोकून दिले. या प्रेरणेच्या बळावरच मी पुन्हा उभारी घेण्याचा निर्धार केला. महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढला. हे करत असताना मला तरुणाईने डोक्यावर घेतले. मला नवा उत्साह मिळाला, मी साताऱ्याच्या सभेत मुसळधार पाऊस अंगाखांद्यावर घेतला. तो पाऊस जनतेच्या मनात झिरपला आणि मतांमधून व्यक्त झाला. महाराष्ट्रात नवीन समीकरणे तयार होऊन आपले सरकार आले. नवे सरकार जेव्हा शपथ घेत होते. तेव्हा माझ्या पहिल्या वहिल्या निवडणुकीला अर्ज भरण्यापूर्वी तुम्ही जे मार्गदर्शन केले होते ते लक्षात होते. राजकीय धामधुमी कमी झाली तसे कोरोना महामारीचं संकट ओढवले. त्यातून अद्याप दिलासा नाही, पण वेळ काढून तुम्हाला पत्र लिहितोय.

बाई, तुमच्यात उपजतच नेतृत्वाचे गुण होते. तुम्ही कौटुंबिक जबाबदारी सांभाळत असतानाच 1935 साली पहिल्या जिल्हा लोकल बोर्डावर निवडून गेलात. लोकल बोर्डावरील विविध जबाबदाऱ्या पार पाडताना तुम्ही आपली वेगळी छाप उमटवली. अगदी तान्ह मूल कडेवर घेऊन, खडतर प्रवास करत तुम्ही बोर्डाच्या बैठकांना जात असत. कळत-नकळत हे सगळे संस्कार माझ्यावर झाले आणि मी सार्वजनिक जीवनात समाधानकारक कामगिरी करू शकलो.

बाई, तुमची विचारसरणी साम्यवादाला पोषक होती. मी मात्र गांधी-नेहरू-यशवंतराव चव्हाण यांच्या काँग्रेस पक्षाच्या विचारधारेकडे ओढलो गेलो. तुम्ही तुमचे राजकीय विचार माझ्यावर लादले नाहीत. राजकीय मतभिन्नता असली तरी परस्पर सुसंवाद राहायला हवा ही शिकवण मला तुमच्याकडूनच मिळाली. माझ्या पंचाहत्तरीच्या वाढदिवसानिमित्त दिल्ली येथे झालेल्या सत्कारप्रसंगी मा. राष्ट्रपती, आजी-माजी प्रधानमंत्र्यांसहित भारतातील सर्व पक्षाचे प्रमुख भेदाभेद विसरून उपस्थित होते. हा अपूर्व सोहळा अशा सुसंवाद राखण्याच्या संस्काराचे फलित आहे असे मी मानतो. त्या सत्कारप्रसंगी तुमचीच मूर्ती माझ्या डोळ्यांसमोर दिसत होती.

बाई ! कौटुंबिक जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकी या दोन्ही बाबी समान न्यायाने सांभाळत, सामान्यांसाठी अखंड काळ काम करत राहण्याचा आपण दिलेला सल्ला मी जतन करीत आहे. तुमच्या संस्काराने आम्ही सर्व भावंडे वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झालो. आपले क्षेत्र स्वत:च्या आवडी-निवडीनुसार निवडायचे स्वातंत्र्य आपण दिले. आणि ते देत असताना आमच्यावर तुमचे सतत लक्ष असायचे हे मला ठाऊक आहे. ‘आम्ही पुण्यात महाविद्यालयीन शिक्षणात लक्ष देतो की नाही, आमचे सवंगडी कोण आहेत, अन्य कोणत्या क्षेत्रात आम्ही रस घेतो’ हे तुम्ही कटाक्षाने पाहायचा.

आम्हा भांवडांसाठी तुम्ही घेत असलेले अपार कष्ट आमची प्रेरणा आहे. सर्वांत थोरले बंधू वसंतराव कायद्याचे पदवीधर झाले. अप्पासाहेबांनी कृषी पदवी घेतली. अनंतरावांनी कला आणि शेती क्षेत्रात स्वत:ची ओळख तयार केली. बापूसाहेबांनी लंडनला बोटीने जाऊन तिथे नोकरी करत इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. सूर्यकांतरावांनी बडोद्याला जाऊन सयाजीराव गायकवाड विद्यापीठात आर्किटेक्चरचे शिक्षण पूर्ण केले. धाकटा प्रताप इंजिनिअर तर झालाच, परंतु त्याने वृत्तपत्र व्यवसायातदेखील लौकिक मिळवला आहे.

बाई, तुम्ही बहिणींनासुद्धा शिक्षण दिले आहेत. त्या आपापल्या संसारात भक्कमपणे उभ्या राहिल्या आहेत. तुम्ही आमच्यासाठी एवढे काही केलत, पण आम्हा भावंडांची तुमच्याबद्दल एक तक्रार आहे.

मी एक दिवस राज्याच्या प्रमुखाची जबाबदारी स्वीकारावी असे तुमचं स्वप्न होते. पण मी राज्याचा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना तुम्ही नव्हतात. अप्पासाहेबांना आणि प्रतापरावांना पद्मश्री मिळाली तेव्हाही नव्हतात. भारत सरकारने मला पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले, त्यावेळी पुन्हा तुमच्या आठवणींनी मी हळवा झालो. चेहऱ्यावर लवलेश दाखवत नसलो तरी तुमची आठवण मनात आजही एक पोकळी निर्माण करते, मनात गहिवर आणते.

बाई, आज तुमची नातवंडंदेखील निरनिराळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. तुम्हाला आम्हा भावंडा-नातवंडांकडे पाहून खूप-खूप समाधान वाटत असेल हे मात्र नक्की. दिवाळीत सर्व कुटुंबीयांनी बारामतीला एकत्र यायचे हा तुमचा निर्णय आम्ही सगळे कटाक्षाने पाळत आहोत. मात्र, ऐन दिवाळीत तुमची खूप उणीव भासते आहे. अधिक काही लिहित नाही. आपण व तीर्थस्वरूप आबा काळजी घ्या.

तुमचा शरद