शरद पवारांची शंका ; लोकसभेसाठीच ‘त्या’ तीन राज्यात भाजपचा पराभव कि … ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा संशय घेतला आहे. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्ता असताना भाजपचा पराभव झाला आणि काँग्रेस विजयी झाली मग लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी तर भाजपने या तिन्ही राज्यात स्वत:चा पराभव करून घेतला नव्हता ना? अशा शब्दांत शरद पवार यांनी ईव्हीएम मशिनवर शंका उपस्थित केली आहे. परिणामी पुन्हा एकदा ईव्हीएमवरून उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

पवार काय म्हणाले , ईव्हीएम मशीन आणि त्यांच्या संख्येबाबत माझ्या मनात फार आधीपासून शंका होती. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड येथे भाजपची सत्ता असताना भाजपाचा पराभव झाला आणि काँग्रेस पार्टी विजयी झाली. पण कदाचित हा पराभव देशाच्या निवडणुका जिंकण्यासाठी तर नाही, अशी शंका माझ्या डोक्यात आली होती. ही तिन्ही राज्ये एकमेकांना लागून आहेत आणि आता भाजप तेथील तत्कालीन सरकार पाडण्याच्या विचारात आहे,याकडेही पवार यांनी लक्ष वेधले आहे.

निवडणूक यंत्रणेबाबत निवडणुकीत कधी नव्हे तितका विचार करण्यात आला. आपले मत योग्य ठिकाणी गेले की नाही याबाबत लोकांना शंका वाटत आहे. देशात लोकांच्या मनात अशी शंका याआधी कधी निर्माण झाली नव्हती. आजही लोकांची शंका कायम आहे, असे सांगत पवार यांनी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवरही शंका उपस्थित केली.