बोहल्यावरून उतरताच नववधुचा दुर्दैवी मृत्यू

शिरुरः पोलीसनामा आॅनलाईन
सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या दोघांचा विवाह अगदी थाटामाटात संपन्न झाला. मात्र नववधुचा अचानक मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली. लग्न सोहळा झाल्यानंतर वधुची डोली सासरी जाण्याएेवजी थेट स्मशानात न्यावी लागली. नववधूला मंडपात ताप आला आणि रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही विदारक घटना घडली आहे शिरुर तालुक्यातील म्हसे बुद्रुक गावात.

सोलापूर जिल्‍ह्यातील अक्‍कलकोटच्या सख्‍ख्या मावस बहिणींचा विवाह म्‍हसे येथील बबन मुसळे यांच्या दोन मुलांबरोबर ठरला होता. त्यानुसार रविवारी (दि. ६) रोजी दुपारी बारा वाजता दोन्‍ही विवाह थाटात संपन्न झाले. जयश्री हिरामण मुसळे (वय १९) हिचा विवाह हिरामण मुसळे यांच्यासोबत झाला. बोहल्यावरून उतरून वधु-वरांनी एकमेकांना मिठाईचे घासही भरवले. मात्र, पुढे अनर्थ घडला. जयश्रीला अचानक ताप आला आणि चक्‍कर येऊ लागली.

उपचारासाठी तिला तात्‍काळ शिरूर येथील रुग्‍णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती. अंगाला हळद असताना सुखी संसाराची स्‍वप्‍ने पाहणार्‍या हिरामनचाही जयश्रीच्या निधनाने स्‍वप्‍नभंग झाला. ही घटना समजताच नातेवाईक आणि परिसरातील लोकांनी गर्दी केली. नववधुच्या रुपात जयश्रीचा मृत्यू सगळ्यांच्या मनाला चटका लावून गेला.