शिवरायांचे नाव घेऊन युती सरकारने फसवलं, शिवस्वराज्य यात्रेच्या समारोपात ‘घणाघात’

अलिबाग : पोलीसनामा ऑनलाइन – विधान सभेच्या घोषणा झाल्यानांतर सर्वच पक्ष निवडणुकांच्या तयारी लागले आहेत. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. राज्यात सत्तेत असलेल्या युती सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेवून केवळ जनतेला फसविण्याचे काम केले नाही, तर महाराजांचा अपमान करण्याचे पाप देखील केले आहे. असा घणाघात राष्ट्रवादीचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी केला आहे. महाड विधानसभा मतदार संघात ते बोलत होते.

महाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेची सांगता झाली. राज्यातील मतदार या सरकारला माफ करणार नाही आणि सत्तेवरुन खाली खेचून ख-या अर्थाने छ. शिवरायांच्या, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे अर्थात काँग्रेस, राष्ट्रवादी काँँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेत आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा विश्वास डॉ. अमोल कोल्हेही यावेळी व्यक्त केला.

शिवनेरी पासून सुरु झालेल्या शिवस्वराज्य यात्रेचा समारोप किल्ले रायगडावर करण्यात आला. यावेळी कोल्हेनी सत्ताधारी युती सरकारवर चांगलीच टीका केली. गुजरात मध्ये पाच वर्षात सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभा राहू शकतो तर मग महाराष्ट्रात छत्रपतींचा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा का नाही ? असा सवाल कोल्हेनी यावेळी उपस्थित केला.

गडकिल्ले भाड्याने देण्याचा निर्णय निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली तरी मागे घेण्यात आलेला नाही. छत्रपती शिवरायांच्या नावाने शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करून शेतकऱ्यांची फसवणूक आणि महाराजांचा अपमान करण्याचे काम या सरकारने केले आहे असा घणाघात कोल्हेनी यावेळी केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, रायगडचे खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी, आ. संजय कदम, आ. अनिकेत तटकरे, महाडचे माजी आमदार माणिक जगताप व पक्षाचे इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.