अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असली तरी शिवसेना – भाजपा युतीने अजून उमेदवारांची यादी जाहीर केली नाहीये. मात्र, अमरावती येथे आयोजित मेळाव्यात शिवसेनेने चार उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.
लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. विशेष म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने पहिली दुसरी यादी जाहीर केली आहे, मात्र आजून शिवसेना भाजपने एकही यादी जाहीर केली नाही. परंतु निवडणुकीच्या प्रचारासाठी युतीच्या महामेळाव्यांना सुरुवात केली आहे. अमरावतीत युतीच्या झालेल्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वाशीममधून भावना गवळी, अमरावतीतून आनंदराव अडसूळ, बुलढाण्यातून प्रतापराव जाधव, तर रामटेकमधून कृपाल तुमाने यांच्या नावाची घोषणा केली. मात्र, अद्यापही या उमेदवारी बाबत अधिकृत घोषणा झाली नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या उमेदवारीबाबत दुजोरा दिलेला आहे. तसेच भाजप शिवसेना युती म्हणजे फेव्हिकॉलचा मजबूत जोड आहे. ती कधीही तुटणार नाही. युती होऊ नये म्हणून अनेकांनी देव पाण्यात टाकून ठेवले होते मात्र आता युती झाल्यानंतर अनेकांनी युतीला घाबरून निवडणुकीमधून माघार घ्यायला सुरुवात केली आहे. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.