शरद पवारांच्या ‘त्या’ विधानावर शिवसेनेची आली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राम मंदिर बांधल्याने कोरोना जाईल का, असे वक्तव्य करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. या वक्तव्याला भाजपाने धार्मिक स्वरूप देत राष्ट्रवादीचा राज्यातील सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेवर टिका सुरू केली होती. यावर शिवसेनेकडून कोणती प्रतिक्रिया येतेय याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणे शिवसेनेकडून प्रतिक्रिया आली असून खासदार संजय राऊत यांनी पक्षाची स्पष्ट भूमिका मांडली आहे. देशातील लाखो डॉक्टर्स, पोलीस, आरोग्य कर्मचारी या सर्वांचे बलिदान कोरोनाशी लढताना झालेले आहे, कोरोनाची लढाई तेच लढतील तेही देवाच्या आशीवार्दाने, असे राऊत यांनी म्हटले आहे.

खासदार राऊत म्हणाले, कोरोनाची लढाई ज्यांना आम्ही देवदूत मानतो ते पांढर्‍या कपड्यातील डॉक्टर लढत आहेत. धर्मावर आणि देवावर श्रद्धा कायम असते. या देशातील लाखो डॉक्टर्स, पोलीस, आरोग्य कर्मचारी या सर्वांचे बलिदान कोरोनाशी लढताना झालेले आहे, आणि ही लढाई तेच लढतील तेही देवाच्या आशीवार्दाने.

राऊत पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे अयोध्येला नेहमीच जातात, मुख्यमंत्री झाल्यानंतरही गेले, नसतानाही गेले. शिवसेना आणि अयोध्येचे नाते असून राजकारणासाठी आम्ही अयोध्येला कधीच गेलो नाही. राम मंदिराचा रस्ता शिवसेनेने तयार केला आहे. मंदिरामध्ये येणारे मुख्य अडथळे शिवसेनेने दूर केलेत. हे सर्व राजकारण म्हणून नव्हे, तर श्रद्धा आणि हिंदुत्व याच भावनेने केले, ते नाते कायम आहे.

यावेळी भाजपाला टोला लगावताना खासदार संजय राऊत म्हणाले की, जर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची रुपरेषा ठरली असेल, तर कोणाकोणाला निमंत्रण पाठवली जातात, त्यामुळे राजकीय सोशल डिस्टेसिंग किती पाळतात हे बघावे लागेल.

शरद पवार म्हणाले होते…
काही लोकांनी वाटतेय की राम मंदिरामुळे कोरोना बरा होईल. कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावे हे त्यांनी ठरवायला हवे. सध्या कोरोनावर लक्ष द्यायला हवे. कोरोनाच्या संकटात सापडलेल्या लोकांनी बाहेर काढायला हवे. कदाचित राम मंदिरामुळे कोरोना जाईल असे त्यांना वाटत असावे. कोरोनामुळे लॉकडाऊन केल्याने देशाची अर्थव्यवस्था खचली आहे. त्यावर मोदींनी लक्ष द्यावे, असे म्हणत राम मंदिराच्या भूमिपूजनावरून शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केली होती. आपले खासदार याबाबत जिथे गरजेचे आहे तिथे सरकारचे लक्ष वेधतील, असेही पवारांनी म्हटले होते.