शिवसेनेच्या मंत्र्याचा नारायण राणेंना सल्ला, म्हणाले – ‘भाजपानं ज्यांना बकरा केला, त्यांनी 11 गोष्टी करू नये’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कुठल्याही क्षणी कोसळू शकते. फार नाही तर 11 दिवसांत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार असल्याचे भाकीत भाजप खासदार नारायण राणे यांनी केले होते. भिवंडी येथील एका कार्यक्रमात बोलताना नारायण राणे यांनी हे भाकीत केले होते. यावर शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

नारायण राणे हे भविष्यकार आहेत का असा सवाल उपस्थित करत गुलाबराव पाटील यांनी राणेंवर टीका केली आहेत. तसेच स्वत:चं भविष्य ते बनवू शकले नाहीत आणि दुसऱ्यांचं काय सांगणार असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना गुलाबराव पाटील बोलत होते. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीचे काम जोरात सुरु असून ज्यांना भाजपने बकरा बनवला त्यांनी अकराच्या गोष्टी करू नयेत असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी नारायण राणे यांचा खरपूस समाचार घेतला.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमधील नेतेमंडळी केवळ सत्तेसाठी आणि पदासाठी एकत्र आलेली आहेत. पदासाठी पैसा आणि पैशासाठी पद हे समीकरण आताचे सत्ताधारी तयार करत आहेत असा टोला नारायण राणे यांनी लगावला होता. तसेच भविष्यात उद्धव ठाकरे भाजपसोबत आल्यास त्याला विरोध करणार का ? असा सवाल देखील नारायण राणे यांनी उपस्थित केला.