छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यसभेवर निवड झालेल्या सदस्यांनी बुधवारी संसदेमध्ये शपथ घेतली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उदयनराजे भोसले, रामदास आठवले, प्रियांका चतुर्वेदी, राजीव सातव आणि भागवत कराड यांनी राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली.

साताऱ्याचे भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांनी शपथ घेताना जय भवानी जय शिवाजी अशी घोषणा दिली होती. मात्र, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी या घोषणेवर आक्षेप घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषवर साक्षात त्यांच्या वारसांवरच आक्षेप घेतल्यामुळे जगभरातील शिवभक्तांचा संताप उफाळून आला आहे. त्यातच आता शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन भाजपवर सणसणीत टीका केली आहे.

खासदार संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वशंजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे ? असा सवाल करत भाजपचे या विषयांवर ‘तोंड बंद’ आंदोलन सुरु झालं आहे. तर दुसरीकडे संभाजी भिडे यांच्याकडून सांगली आणि सातारा जिल्हा बंदची घोषणा अद्याप झालेली नाही. असे म्हणत संजय राऊत यांनी भाजप आणि समर्थकांना जाब विचारला आहे.

राज्यसभेत नेमकं काय झालं
राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनात बुधवारी नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा झाला. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून हा सोहळा पार पडला. त्यामुळे मोजक्याच सदस्यांना शपथ देण्यात आली. महाराष्ट्रातून सर्वात आधी सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी शपथ घेतली. विशेष म्हणजे त्यांनी इंग्रजीतून शपथ घेतली. यानंतर उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतली. त्यांनी देखील इंग्रजीतून शपथ घेतली. मात्र, शपथ घेतल्यानंतर त्यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी… जय शिवाजी असा जयघोष करत शपथ पूर्ण केली.

उदयनराजेंनी जयघोष केल्यामुळे राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप नोंदवला. हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नाही आहे, त्यामुळे पटलावर रेकॉर्ड होणार नाही. हा शपथविधी माझ्या दालनात होत आहे. त्यामुळे नवनिर्वाचित सदस्य उदयनराजे यांनी याबद्दल पुढे दक्षता घ्यावी. अशी सूचना व्यंकय्या नायडू यांनी केली.