पंतप्रधानजी, देश तुमच्यासोबत पण सत्य काय आहे ? : संजय राऊत

पोलिसनामा ऑनलाईन – भारत व चीन सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षात लष्कराच्या 20 जवानांना वीरमरण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून पूर्व लडाखमधील सीमाभागात तणाव निर्माण झाला होता. तणाव निवळण्यासाठी सुरू असलेल्या चर्चेदरम्यान ही घटना घडली. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीही सीमेवरील स्थितीविषयी पंतप्रधानांना सत्य सांगण्याच आवाहन केले आहे.

लडाखमधील गलवाण खोर्‍यात झालेल्या संघर्षात 20 जवान हुतात्मा झाल्यानंतर विरोधकांकडून मोदी सरकारला जाब विचारला जात आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीही यासंदर्भात एक ट्विट केले आहे. चीनच्या घुसखोरी केव्हा चोख प्रत्युत्तर मिळणार आहे? गोळीबार न होता आपले 20 जवान शहीद झाले आहेत. आपण काय केले? चीनचे किती सैनिक मारले गेले? चीनने भारताच्या हद्दीत घुसला आहे का? पंतप्रधानजी, संघर्षाच्या या काळात देश तुमच्या सोबत आहे. पण, सत्य काय आहे? बोला. काहीतरी बोला. देशाला सत्य ऐकायचे आहे. पंतप्रधानजी तुम्ही शूर व यौद्धे आहात तुमच्या नेतृत्वाखाली देश चीनचा बदला घेईल जय हिंद, असे ट्विट करत राऊत यांनी पंतप्रधानांना सत्य सांगण्याचे आवाहन केले आहे.