ED च्या धाडीमुळे माझं तोंड बंद होणार नाही; देशासाठी, मुंबईसाठी फाशी दिली तरी ती स्वीकारायची तयारी : आ. सरनाईक

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची बदनामी होत असेल, तर अशा गोष्टींवर आ. प्रताप सरनाईक ( MLA Pratap Sarnaik) बोलत राहणार. ईडीचे (ED ) छापे पडले म्हणून सरनाईकचे तोंड बंद होणार नाही. महाराष्ट्रासाठी, देशासाठी, मुंबईसाठी फाशी दिली तरी ती स्वीकारायची तयारी आहे, अशी आक्रमक भूमिका सरनाईक यांनी मांडली आहे.

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयांवर काल सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी छापे टाकले होते. त्यांचे पुत्र विहंग यांना ताब्यात घेऊन त्यांची पाच तास चौकशी केली. त्यानंतर परदेशात असलेले सरनाईक आज मायदेशी परतले असून, सरनाईक पितापुत्रांची इडीने चौकशी सुरू केली आहे.

ज्या दिवशी अर्णब गोस्वामी, कंगना रणौत यांच्यावर हक्कभंग दाखल केला, अन्वय नाईक प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू करण्याची मागणी लावून धरली, त्याच दिवशी उद्या काय होणार याचा मी विचार केला होता. आम्ही संघर्ष करत इथपर्यंत पोहोचलो आहोत. शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांनी मला आमदार केले आहे. एका पक्षाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्या पक्षाची धोरणे, भूमिका प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट करणे ही माझी जबाबदारी असल्याचे आ. सरनाईक म्हणाले. ईडीचे लोक माझ्या मुलाला तुमचे वडील कंगना, अर्णब, अन्वय नाईक प्रकरणावर खूप बोलत असल्याचे विचारत होते, असे सरनाईक यांनी सांगितले. ‘ईडीच्या लोकांनी माझे कार्यालय, घरी सगळीकडे चौकशी केली, कागदपत्रे ताब्यात घेतली. मी गेल्या 30 वर्षांपासून बांधकाम आणि हॉटेल व्यवसायात आहे. त्याची सर्व कागदपत्रे आहेत. ईडीच्या लोकांना माझे कर्मचारी, मुलाने माहिती दिली आहे. मात्र, त्यानेही त्याचे समाधान झाले नाही. मला चौकशीला बोलावल्यास त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यास मी समर्थ आहे, असल्याचे सरनाईक म्हणाले. टॉप्स एजन्सीसोबत असलेल्या आर्थिक संबंधांवरून सरनाईक ईडीच्या रडारवर आहेत. त्यावरही सरनाईक यांनी स्पष्टीकरण दिले आहे.