‘त्या’ शिवसेना आमदाराचा राजीनामा ; काँग्रेसकडून लोकसभा लढण्याची शक्यता

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन – वरोरा-भद्रावतीचे आमदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांनी शिवसेनेतून निवडून आल्यामुळे शिवसेनेच्या आमदारकीचा आणि सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांकडून आपल्याला अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचे आरोप धानोरकर यांनी केले आहेत. राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या काँग्रेस प्रवेशाची शक्यता आहे. युती होताच धानोरकर यांनी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या विरोधात टीका करायला सुरुवात केली होती. आज त्यांनी राजीनामा देऊन शिवसेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ घातला आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नाही म्हणून धानोरकरांच्या रूपाने हंसराज अहिर यांच्या विरोधात चांगलीच लढत होऊ शकते. विजय वडेट्टीवार, माजी आमदार सुभाष धोटे व माजी खासदार नरेश पुगलिया या चार नावाशिवाय काँग्रेसकडे तगडा उमेदवार नाही. तसेच वडेट्टीवार व धोटे यांच्या मानात लोकसभा निवडणूक लढण्याची जरा हि इच्छा नाही. विजय वडेट्टीवार आणि बाळू धानोरकर यांच्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीपासून चांगलीच मैत्री झाली आहे. त्यामुळे धानोरकरांना काँग्रेसमध्ये आणण्यात विजय वडेट्टीवार यांचा हात असण्याची शक्यता आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात वरोरा, चंद्रपूर, राजुरा, वणी आणि आर्णी हे पाच विधानसभा मतदारसंघ कुणबी बहुल आहेत. त्यामुळे काँग्रेसला सध्या युवा कुणबी नेतृत्वाची अत्यंत गरज आहे. अशा सगळ्या जातीय समीकरणामुळे बाळू धानोरकरांना काँग्रेसमध्ये समाविष्ट करून घेण्यास काँग्रेस नेते उत्सुक असणार आहेत.