ED च्या आतल्या गोष्टी BJP च्या माकडांना कशा ठाऊक ? : खासदार संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन  –  शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ED ने समन्स बजावले असून त्यांना मंगळवारी (दि. 29) चौकशीसाठी बोलावले आहे. त्या पार्श्वभूमीवर खा. राऊत यांनी सोमवारी (दि. 28) शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भाजप आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला. गेल्या दीड महिन्यांपासून ED कडून आमच्याकडे माहिती, कागदपत्रे मागितली जात आहेत. आम्ही त्यांना आवश्यक माहिती देत आहोत. ED ने अद्याप तरी त्यांच्या नोटिशीत पीएमसी बँक घोटाळ्याचा उल्लेख केलेला नाही. मग भाजपच्या माकडांना ही माहिती कुठून मिळाली. ते कालपासून उड्या कसे काय मारू लागले, असा सवाल खा. राऊत यांनी उपस्थित केला आहे.

केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांना जेव्हा विरोधकांना राजकीयदृष्ट्या संपवता येत नाही, तेव्हा ईडी, सीबीआयसारखी हत्यार वापरावी लागतात. त्यामुळेच वर्षभरात शरद पवार, प्रफुल्ल पटेल, एकनाथ खडसे, प्रताप सरनाईकांना ईडीकडून नोटीसा पाठवण्यात आल्या. भाजपला रोखण्याच्या प्रक्रियेत असलेले नेते जेव्हा दबावाला बळी पडत नाहीत, तेव्हा त्यांना असे कागदाचे तुकडे पाठवले जातात. पूर्वी सीबीआय, ईडीने कारवाई केली की लोकांना त्याबद्दल गांभीर्य वाटायचे. पण गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या कारवाया म्हणजे केंद्रातल्या पक्षाने भडास काढण हे लोकांनी गृहित धरले आहे, अशा शब्दात राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

तूम्ही कितीही प्रयत्न करा, महाविकास आघाडी सरकार पडणार नाहीः खा. राऊत
राज्यातलील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी षडयंत्र रचल जात असल्याचा आरोप खा. राऊत यांनी केला आहे. राज्यातलं सरकार आम्ही पाडायच ठरवलं आहे. त्यासाठी आमची यंत्रणा सज्ज आहे. मला इशारे दिले जात आहेत. धमकावण्याचा प्रयत्न होत आहे. पण मी त्यांचा बाप आहे. अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही, अशा इशारा त्यांनी भाजपला दिला. माझ्यावर दबाव आणण्यासाठी शिवसेना आमदारांची नावांची यादी दाखवली गेली. या आमदारांना ईडी ताब्यात घेईल. त्यांचे राजीनामे घेतले जातील. सरनाईक हे याच कारवाईचं टोकन आहे, असे सांगण्यात आलं. पण तुम्ही कितीही प्रयत्न करा, हे सरकार पडणार नाही, अशा शब्दांत राऊत यांनी भाजपवर जोरदार शरसंधान साधले आहे.