…तर तेव्हा काळ्या चड्ड्या घालून आंदोलन करायचं होतं, संजय राऊतांची भाजपवर टीका
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून सर्वत्र हाहाकार उडाला आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार असमर्थ असल्याचे सिद्ध झाल्याची टीका करत भाजपने शुक्रवारी ‘महाराष्ट्र बचाव आंदोलन’ पुकारलं होत. यात ‘मेरा अंगण मेरा रणांगण’ अशी घोषणा देत पक्षातील भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या घराबाहेर फलक, काळे झेंडे दाखवत सरकारचा निषेध केला. तर दुसरीकडे भाजपच्या महाराष्ट्र बचाव आंदोलनावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी तिखट शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे.
विरोधी पक्ष म्हणून भाजप अपयशी ठरल्यानं ते आंदोलन करत आहेत. भाजपचं हे आंदोलन पूर्णत: फसलं आहे. केवळ भाजप नेत्यांच हे आंदोलन आहे. जनता यात सामील झाली नाही. आज तर आकाशात काळे कावळेही दिसले नाहीत, अशा शब्दात राऊत यांनी भाजपच्या आंदोलनाचा समाचार घेतला. एवढच नाही तर भाजपला आंदोलन करायचं होतं तर त्यांनी मुंबईतून आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातमधील गांधीनगरमध्ये हलवल्यानंतर काळ्या चड्ड्या घालून आंदोलन करायला हवं होतं, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
दरम्यान, ठाकरे सरकार कोरोना विरोधातील लढाईत अपयशी ठरल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. देवेंद्र फडणवीस हे गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत आहेत. भाजपच्या टीकेला काँग्रेस पाठोपाठ आता शिवसेनेने देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.