पुन्हा CM म्हणून नितीश कुमारांना लादणे जनमताचा अवमान; शिवसेनेची टीका

बिहार : वृत्तसंस्था – बिहारच्या निवडणुकीत जदयुला (JDU) लोकांनी धूळ चारली आहे. तिस-या क्रमांकावर फेकलेल्या नितीशकुमार (Nitish Kumar) यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदी लादणे हा लोकमताचा अवमान आहे. तसेच हरलेल्या पहिलवानास विजयाचे पदक देण्यासारखाच हा सोहळा ठरेल, असे म्हणत शिवसेनेने ( Shiv Sena) नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

नितीश कुमारांनी मुख्यमंत्री म्हणून चढाई केलीच तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीची ती दारुण शोकांतिका ठरणार आहे. निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सरशी केली आहे. त्या सरशीसाठी भाजपने निवडणुकीच्या रिंगणात जे मोहरे फिरवले, त्यात ओवेसी यांना पहिला क्रमांक द्यावा लागेल, असेही सेनेने म्हटले आहे. सेनेनं सामनाच्या संपादकीयमधून यावर निशाणा (shiv-sena-saamna-editorial-criticize) साधला आहे.

काय म्हटले आहे अग्रलेखामध्ये ?
बिहारची सूत्रे अखेर भारतीय जनता पक्षाकडे गेली आहेत. नितीश कुमार मुख्यमंत्री होतील, पण भारतीय जनता पक्षाच्या तालावर त्यांना काम करावे लागेल. बिहारात भाजपचा प्रचंड विजय झाला. त्याचे श्रेय पंतप्रधान मोदी (pm-narendra-modi) यांनाच मिळायला हवे. त्याचा आनंदोत्सवही साजरा झाला, पण आकड्यांच्या खेळात ‘एनडीए’ला निसटता विजय मिळाला आहे आणि खरा विजेता 31 वर्षांचा तेजस्वी यादव (tejashwi-yadav) हाच आहे. तेजस्वी यांचा राष्ट्रीय जनता दल बिहारातला पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. हे भाग्य भाजपला लाभले नाही. त्यामुळे सत्ता राखली याचा आनंद जरूर साजरा करता येईल, मात्र विजयाचा शिरपेच तेजस्वी यादवच्याच डोक्यावर आहे.

ओवेसी हे मोदी किंवा भाजपचे प्यादे असल्याचा आरोप नेहमीच केला जातो. बिहारातही तोच आरोप झाला. ओवेसी यांनी उमेदवार उभे केल्यामुळे तेजस्वी यादव व त्यांच्या आघाडीचे किमान 15 उमेदवार पराभूत झाले. या 15 जागांनीच बिहारच्या राजकारणाचे चित्र पालटून टाकले व तेजस्वी यांची घाेडदौड शेवटच्या टप्प्यात थांबली. चिराग पासवान यांचे प्रयोजन निवडणुकीत नितीश कुमार यांचे पंख छाटण्यासाठीच केले होते. बिहार निवडणुकांचे निकाल चंचल आहेत. बहुमत काठावरचेच आहे. कोणाचा पाय कधी घसरेल व मन कसे फिरेल, ते सांगता येत नाही.
भारतीय जनता पक्षाचा ‘खेळ’ यशस्वी झाला. भाजपचा डंका वाजला. नितीश कुमारांची पीछेहाट झाली. आता काही काळासाठी नितीश कुमार यांची वरात काढून त्यात ‘घोडे’ नाचवले जातील, पण ही तात्पुरती व्यवस्था आहे, हे सांगायला कुणा राजकीय पंडिताची गरज नाही. खुर्चीवर नितीश कुमारांना बसवून ‘बादशाही’ची सूत्रं भाजपच्याच हाती ठेवली जाणार आहेत. तेजस्वीच्या रूपाने फक्त बिहारलाच नाही तर देशालाच एक तडफदार युवा नेता मिळाला आहे. तो एकाकी लढत राहिला. तो विजयाच्या शिखरावर पोहोचला. तो जिंकला नसेल, पण त्याने पाठही टेकवली नाही. देशाच्या राजकीय इतिहासात या संघर्षाची नोंद नक्कीच होईल. बिहारमध्ये भाकरी फिरेल असे वाटले होते, पण भाकरी साफ करपली असल्याचे म्हटले आहे.