मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला विरोधी पक्षाला लाज वाटतेय का ?

पोलिसनामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाचे संकट गडद असताना भाजपने ‘महाराष्ट्र बचाव आंदोलन’ हाती घेतले आहे. या आंदोलनावरून शिवसेनेने आता विरोधकांवर निशाणा साधला आहे. ठाकरे सरकारच्या हाती महाराष्ट्र सुरक्षित असल्याची भावना जनतेची आहे. त्यामुळे सध्याच्या उठवळ विरोधी पक्षापासूनच महाराष्ट्राला वाचवा, असे सांगण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र प्रकाशमान, तेजस्वी करण्याचे युद्ध सुरू असताना राज्य ‘काळे’ करण्याचे आंदोलन सुरू झाले आहे. डोमकावळ्यांचे हे फडफडणे औट घटकेचेच ठरेल, याविषयी आमच्या मनात शंका नाही. राज्यपालांच्या ‘अंगणात’ लोळण घेण्यापेक्षा राज्याचे प्रश्न घेऊन विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या घरात येऊन चर्चा केली पाहिजे. राज्याच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला विरोधी पक्षाला लाज वाटत आहे का? असा सवाल करत शिवसेनेने भाजपावर हल्लाबोल केला.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील आणि माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरदेखील सामनाच्या संपादकीयमधून विरोधकांवर टीकेचे बाण सोडले आहेत. पाटील-फडणवीसांनी भान राखून वागावे-बोलावे. शहाण्यांना शब्दांचा मार पुरेसा असतो, पण विरोधकांत शहाणपण उरले आहे काय? असा सवालही करण्यात आला आहे.महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने ‘ठाकरे सरकार’विरुद्ध आंदोलन पुकारले आहे. सारा देश कोरोनाविरुद्ध लढ्यात झोकून देऊन काम करीत असताना महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाला फालतू आंदोलनाचे डोहाळे लागले आहेत.

‘मेरा आंगण, मेरा रणांगण’ अशा प्रकारचे बारसे या आंदोलनाचे झाले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून या मंडळींना महाराष्ट्र वाचवायचा आहे. महाराष्ट्र भाजपचा आदेश आहे की सर्वच काळे करा. हा सर्वच प्रकार म्हणजे येड्यांची जत्रा आहे. महाराष्ट्राचे अंगण स्वच्छ आहे व करोना योद्धे रणांगणात लढत आहेत. देशात आरोग्यविषयक आणीबाणी आहे. महाराष्ट्र सरकार ‘केरळ मॉडेल’चा मार्ग न स्वीकारता पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा यांच्याशी समन्वय साधून काम करीत आहे, कोरोना युद्धाचे नेतृत्व पंतप्रधान मोदींकडेच आहे व राहील हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केले आहे. हे जर भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांच्या पचनी पडत नसेल तर त्यांनी खुशाल आंदोलन करावे. मात्र हे आंदोलन त्यांच्याच नेत्यांच्या विरोधात ठरेल हे त्यांनी लक्षात ठेवावे.