विरोधकांचा ‘धृतराष्ट्र’ झाला त्याला काय करणार ?, शिवसेनेची टीका

पोलिसनामा ऑनलाईन – निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोकणचा दौरा केला. त्यानंतर पवारांना आताच जाग आली का?, असा सवाल भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी केला होता. यावरून शिवसेनेने भाजपाला धारेवर धरले आहे. शरद पवारांना संकटकाळी जाग असतेच. तेव्हा उगाच विरोधकांनी बोंब मारून स्वत:चेच पोट व घसा दुखवून घेऊ नये. ‘निसर्ग’ वादळात ‘बाम’च्या डब्याही उडून गेल्या आहेत! चंद्रकांत पाटील, दुखणारे पोट नुसतेच शेकत बसा, असं म्हणत शिवसेनेनं भाजपावर निशाणा साधला आहे.

संकटकाळात महाराष्ट्राचे सरकारही जागेच आहे, पण विरोधकांचा धृतराष्ट्र झाला त्याला काय करायचे? त्यांना चांगले काही दिसत नाही. पश्चिम बंगालात वादळ व महाराष्ट्रात फक्त गार वारे सुटले अशी स्थिती नाही. मग पंतप्रधान दोन-पाच हजार कोटींची मदत घेऊन महाराष्ट्रात का पोहोचले नाहीत? आणि चंद्रकांत पाटलांनीही केंद्राला का जागे केले नाही? प. बंगालात विधानसभा निवडणुका येत आहेत म्हणून केंद्राची लगबग दिसते. महाराष्ट्रात किमान साडेचार वर्षे विधानसभा निवडणूक होत नाही. पुन्हा त्यानंतरही भाजपला येथे सत्ता मिळणार नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे त्यांनी काहीकाळ झोपलेलेच बरे, असे म्हणत शिवसेनेने भाजपावर टीकेचा बाण सोडला आहे. सामनाच्या संपादकीयमधून विरोधकांवर निशाणा साधला आहे. संपूर्ण देश कोरोनाग्रस्त झाला आहे हे सत्य, पण महाराष्ट्रातील भाजपचे पुढारी कोरोना आणि निसर्ग वादळ असे बेकाबू संकट कोसळलेले असूनही कमालीचे राजकारणग्रस्त झाले आहेत. त्यांची कीव करावी तेवढी थोडीच. निसर्ग वादळाच्या तडाख्यात सापडलेल्या कोकणी जनतेला दिलासा देण्यासाठी शरद पवार हे दोन दिवसांच्या दौर्‍यावर गेले. मुख्यमंत्री ठाकरे यांनीही रायगडचा छोटेखानी दौरा केला. ते पुन्हा एकदा तेथे जातील असे दिसते.