मोदीभक्त म्हणवून घेणार्‍यांचेच मेंदू सडलेले : शिवसेना

पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाने थैमान घातले असून बाधितांचा आकडाही आता 200 च्या वर गेला आहे. दुसरीकडे इस्लामपुरातही थैमान घातले असून त्या ठिकाणच्या अनेकांना करोनाची बाधा झाली आहे. अशातच काही जणांकडून राजकारणाला सुरूवात झाली आहे. संपूर्ण देश या लढ्यात मोदींच्या पाठीशी उभा आहे. राहुल गांधी यांनीही मोदींच्या प्रयत्नांना संपूर्ण पाठिंबा दिला आहे. मात्र स्वत:ला मोदीभक्त म्हणवून घेणार्‍यांचेच मेंदू सडले आहेत. इस्लामपूरबाबत जे विधान महाराष्ट्रातील चवचाल भाजपावाल्यांनी केले ते मोदींच्या कानावर गेले तर मोदीच अशा भंपक मंडळींच्या बाबतीत कठोर निर्णय घेतील, असे म्हणत शिवसेनेने भाजपावर टीकेचा बाण सोडला आहे.

लॉकडाउन कठोरपणे राबवूनही लोक बाहेर पडतात तेव्हा ते आपल्या व दुसर्‍यांच्या जिवाशी खेळतात. यात ना मोदींचा संबंध ना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा दोष! परदेश प्रवास लपवून ठेवणार्‍यांनी आणि क्वारंटाइनचे नियम मोडणार्‍यांनी महाराष्ट्रावर हे संकट आणले आहे. अर्थात, हा इतका अभ्यासही भाजपच्या लोकांकडे नसल्यामुळेच इस्लामपुरातील कोरोना हा मोदींच्या देवत्वाचा प्रकोप असल्याचे विधान केले जात आहे. अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांसाठी ही योग्य केस आहे. मोदींवर टीका केल्यास महामारी पसरते अशी अंधश्रद्धा पसरवणार्‍यांवर कायद्याने कारवाई व्हावी असे शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून भाजपावर हल्लाबोल केला आहे.

काय म्हटलंय अग्रलेखात ?
देशभरात कोरोनाचा हैदोस सुरू असताना राजकारणी लोक तोंडास येईल ते बोलत आहेत. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे पंचवीसच्यावर कोरोनाग्रस्त सापडले आहेत. त्याचे खापर भाजप प्रवक्त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करणार्‍यांवर फोडले आहे. देशभरातला लॉकडाउन आधीच जाहीर करायला हवा होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचे मत मांडले. यावर भाजपला इतक्या मिरच्या झोंबायचे कारण काय? म्हणजे ज्यांनी ज्यांनी या काळात मोदींवर टीका केली त्या प्रत्येकाच्या गावात, घरात, जिल्ह्यांमध्ये कोरोना घुसू द्या व बळी जाऊ द्या असे भाजपच्या प्रवक्त्यांना वाटत असावे.