‘गरज सरो पटेल मरो’ हा त्याच नाट्याचा भाग; सामनातून थेट PM मोदींवर ‘निशाणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नरेंद्र मोदी यांचे नाव सरदार पटेलांच्या जागी दिले म्हणून इतके अकांडतांडव का करता ? हा बदल त्यांच्या गुजरातच्या जनतेकडून स्वीकारण्यात आला आहे. ५ महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव करत भाजप विजयी झाला आहे. सरदार पटेलांपेक्षा मोदी महान झाल्याने लोकांकडून त्यांना भरभरून मते देण्यात येत आहे. जर गुजरातलाच सरदार पटेलांविषयी आस्था नसेल तर इतरांनी विरोधाच्या टिपऱ्या का बडवायच्या? आताच्या राजकारणात सरदार पटेलांचे महत्त्व संपले आहे. उद्या नेताजी बोसही संपतील. तसेच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा वापरही मागच्या निवडणुकीत करण्यात आला होता. आता ‘गरज सरो, पटेल मरो’ हा त्याच नाट्याचा भाग आहे, अशी जोरदार टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

जगातली प्रत्येक मोठी गोष्ट गुजरातसाठी, या ध्यासाने मोदी-शहांचे सरकार पछाडले आहे
दिल्लीतील मोदी-शहांचे सरकार हे जगातली प्रत्येक मोठी गोष्ट गुजरातलाच करायची या ध्यासाने पछाडलेले आहे. त्यात त्यांचे काही चुकीचे आहे असे वाटत नाही. आपल्या मातीवर प्रेम असणे हा काही गुन्हा नाही पण एका देशाचे नेतृत्व करीत आहोत हे भान विसरून कसे चालेल! अशा मोठ्या कामांची जंत्री मोठी आहे म्हणून वाजंत्री लावून सांगण्याची काही गरज नाही वाटत. आज हा विषय जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमला नरेंद्रभाई मोदी यांचे नाव दिल्यामुळे चर्चेत आला आहे.

पटेल यांचे नाव पुसण्याचा प्रयत्न नक्की कोणाकडून केला जात आहे ?
सरदार पटेल यांचा सर्वात उंच पुतळा गुजरातमध्ये उभारण्यात आला. सरदार पटेलांचा पुतळा अमेरिकेतील ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ पेक्षा मोठा आहे. मोदी यांच्याकडून काँग्रेसने अपमानित केलेल्या सरदारांचा मानसन्मान, उंची वाढविणारा गुजरातमधील सरदार पटेल यांचा पुतळा असल्याचे सांगण्यात येत होते. पटेल यांचे नामोनिशाण मिटविण्याचा प्रयत्न काँग्रेस किंवा नेहरू-गांधी घराण्याने केला असे गेल्या ५ वर्षांमध्ये मोदी यांच्याकडून सांगण्यात आले आहे. पण गुजरातमधील सरदार पटेल स्टेडियमचे नाव बदलून ते मोदी स्टेडियम करावे असे काही सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांनी सुचवले नाही. पटेल यांचे नाव पुसण्याचा प्रयत्न नक्की कोणाकडून केला जात आहे हे आता दिसत आहे.

तर याला अंधभक्तीची पुढची पायरी मानावी लागेल
मोदी हे महान आहेत त्याबद्दल शंका घेण्याचे काहीच कारण नाही. पण मोदी सरदार पटेल, महात्मा गांधी, पंडित नेहरू किंवा इंदिरा गांधी यांच्यापेक्षाही महान आहेत असे मोदी भक्तांना वाटत असेल तर त्यास अंधभक्तीची पुढची पायरी म्हणावे लागेल. मुळात सरदार पटेलांचे नाव काढून मोदी यांचे नाव लावण्याचा प्रयत्न व खटाटोप ज्यांच्याकडून करण्यात आला त्यांनीच मोदी यांना लहान केले आहे.

लोकांनी बहुमत दिले म्हणजे बेपर्वा वागण्याचा परवाना नाही दिला
लोकांनी तुम्हाला बहुमत दिले म्हणजे बेपर्वा वागण्याचा परवाना आहे. जेव्हा सरदार पटेल, पंडित नेहरू यांच्याकडे बहुमत होते ते देश घडविण्यासाठी. नेहरू यांनी आयआयटीपासून भाभा अणुशक्ती केंद्र, भाक्रा-नांगल योजना राष्ट्राला समर्पित केल्या. तसेच मोदी यांच्या काळात काय झाले, तर जगातील सर्वात मोठय़ा क्रिकेट स्टेडियमला सरदार पटेलांचे नाव होते ते पुसून मोदींचे नाव देण्यात आले. असे मोदींच्या भक्तांना इतिहासात नोंद करून हवे आहे काय?

या सरकारकडून सरदार पटेलांचे कोणते आदर्श पाळण्यात आले ?
कालपर्यंत सरदार पटेलांचे गुणगान गाणारे हे लोक एका स्टेडियमच्या नावासाठी सरदारविरोधी होतात, हा एक प्रकारचा व्यापार म्हणावा लागेल. उद्या प. बंगालात सत्तांतर झाले तर (शक्यता अजिबात नाही) नेताजी बोस यांच्या नावे असलेल्या संस्थांची नावेसुद्धा बदलण्यात येतील. अशी लोकांना भीती वाटू लागली आहे. सरदार पटेल हे काही फक्त गुजरातचे नेते नव्हते तर ते गांधी-नेहरूंप्रमाणे देशाचे आदर्श होते व आहेत. पण सरदार पटेलांचे कोणते आदर्श या सरकारकडून पाळण्यात आले आहे?

आज देशातील शेतकऱ्यांची काय अवस्था आहे ?
स्वातंत्र्याच्या महाभारतातील बारडोलीचा लढा हे अत्यंत तेजस्वी पर्व मानले जाते. हा लढा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढण्यात आला होता. त्याचे नेतृत्व सरदार पटेल यांच्याकडून करण्यात आले होते. काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून ”मी शेतकरी आहे!” (”हूं खेडूत छू!”) अशी गर्जना करणारे सरदार पटेल हे पहिलेच अध्यक्ष होते, पण आज देशातील शेतकऱ्यांची काय अवस्था आहे? ४ महिने झाले दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. त्या आंदोलनामध्ये सहभागी असणार शेतकरी सरदार पटेलांचा जयजयकार करत आहेत. म्हणून सरदार पटेल यांच्या नावाची स्टेडियमवरील पाटी पुसण्यात आली काय?, असा प्रश्न उपस्तिथ होत आहे. मोदी यांच्या सरकारला भव्यदिव्य, उत्कट असे काही करायचे असेल तर त्याचे स्वागत आहे, पण आधीचेच प्रकल्प रंगरंगोटी करून बदलून आणि नामांतरे करून काय मिळवले ?

मोदी हे फकीर, कधीही ‘झोला’ उचलून जंगलात किंवा हिमालयात जातील
जे काही घडले यामध्ये मोदींचा काही दोष नसेलही. मोदी हे फकीर आहेत व कधीही ‘झोला’ उचलून जंगलात किंवा हिमालयात जातील. मोदींच्या भक्तांकडून हे उलटेसुलटे उद्योग करण्यात येत आहे. मोदी हे एखाद्या योग्यासारखे तटस्थ व नम्र असल्याने ते या उद्योगांकडे शांतपणे पाहत आहे एवढेच ! असे सामनाच्या अग्रलेखातून सांगण्यात आले आहे.