भगव्यावरून सेना- भाजपत खडाजंगी !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपचा मुख्यमंत्री झाला नाही, त्यांना विरोधी बाकांवर बसावे लागले. याचे दुःख भाजप नेत्यांच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. त्याचाच वचपा काढण्यासाठी भाजपने आता शिवसेनेचा सर्वांत मोठा गड असलेल्या मुंबई महापालिकेवर (Brihanmumbai Municipal Corporation) लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, ही सत्ता खेचून आणण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.

मुंबई महापालिकेवर भगवा फडकवणार अशी गर्जनाच देवेंद्र फडणवीस (devendra-fadanvis) यांनी केली आहे. तर तुमच्या 100 पिढ्या आल्या तरी शिवसेनेचा भगवा उतरवणे सोडाच पण त्याला हातही लावता येणार नाही, असा टोला खा. संजय राऊतांनी ( shiv-sena-sanjay-raut) फडणवीसांना लगावला, त्यानंतर आता पुन्हा भगव्यावरून शिवसेना-भाजप यांच्यात खडाजंगी सुरू झाली आहे.

राऊत म्हणाले की, मुंबई महापालिकेवर फडकणारा भगवा मराठी अस्मितेचा आहे. हा भगवा राजकारणाचा नाही, छत्रपतींच्या तेजातून निर्माण झालेला हा भगवा आहे. भगवा तुमचा अन् आमचा वेगळा नाही, छत्रपतींचा भगवा, मराठी अस्मितेचा भगवा आहे. तुम्हाला भगवा फडकवायचा असेल, तर बेळगाव महापालिकेवर फडकवावा, काश्मीरवर फडकवावा, बलुचिस्तानवर फडकवावा, राजकारणात टीका-टिप्पणी होत असतात, आमचे हिंदुत्व जनतेला माहिती आहे असेही ते म्हणाले.
तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राऊतांना टोला लगावला आहे, आता कुठला भगवा राहिलाय? शिवसेनेच्या भगव्यात भेसळ झालीय, चीनच्या मदतीने काश्मीरमध्ये 307 कलम पुन्हा लागू करू, वीर सावरकरांचा घाणेरड्या शब्दांत अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणारे भगव्याचा अपमान करताहेत असे ते म्हणाले.

त्यांच्या भगव्या झेंड्याचे शुद्धीकरण गरजेचे – शेलार
शिवसेनेच्या भगव्या झेंड्याच्या शुद्धीकरणाची वेळ आली आहे. त्यांनी हिंदुत्व सोडून दिलेले आहे. त्यांची मनोधारणाच गोऱ्या लोकांच्या कामासारखी आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकांना यांनी तिलांजली दिली आहे, अशा शब्दांत भाजप नेते आशिष शेलारांनी (bjp-ashish-shelar) शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

वीजबिलावरून राऊतांचा भाजप-मनसेवर निशाणा
ऊर्जा खात्यातील थकबाकीला मागील भाजप सरकारच जबाबदार आहे, त्यामुळे कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन भाजपचे आंदोलन होत आहे का ? आम्ही केवळ आरोप करत नाही तर थकबाकी वसूल झाली तर जनतेला नक्कीच दिलासा देऊ, असे सांगत शिवसेना नेते संजय राऊतांनी भाजप-मनसेला चिमटा काढला आहे.