‘चांदमिया पाटील, तुम्ही छाती फाडण्याची गरज नाही’, शिवसेनेची ‘सामना’तून टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रभू रामचंद्राशी नातं असल्याचं दाखवण्यासाठी शिवसेनेनला अयोध्येत जावं लागतं, पण आमची छाती फाडली तर तुम्हाला त्यात रामच दिसेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर टीका करणाऱ्या चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामनाच्या’ अग्रलेखातून खरपूस समाचार घेण्यात आलाय. त्यात चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख ‘चांदमिया’ असा करण्यात आला आहे.

चांदमिया पाटील यांनी छातीची तपासणी करावी, त्यांनी छाती फाडण्याची गरज नाही. त्यांच्या छातीत हिंदुत्वाच्या बाबतीत किती काळेकुट्ट विष ठासून भरले आहे, याचा अनुभव शंभर दिवसांपूर्वी महाराष्ट्राने घेतला आहे. राम समजायला सत्यवचन व माणुसकी समजून घ्यावी लागते. अशा शब्दांत शिवसेनेने टीका केली आहे.

शिवसेनेचे हिंदुत्व ढोंग वाटणे हेच खरे ढोंग

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची यात्रा यथासांग पार पडली. त्यामुळे महाराष्ट्रातील विरोधकांचे पोटविकार बळावल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यांनी ठाकरे सरकारच्या अयोध्या यात्रेवर फालतू टीका-टिपणी सुरु केली. त्यात त्यांचेच तोंडात लपवलेले राक्षसी सुळे जनतेला दिसत आहे. उद्धव ठाकरे हे अयोध्येस गेले, ते तिथे प्रथम गेले काय? राज्यात फडणवीसांचे व केंद्रात मोदींचे सरकार असताना उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचा मोठा फौजफाटा घेऊन अयोध्येस जाऊन आले. दर्शन घेतले, शरयूच्या तीरी त्यावेळी भव्य महाआरती केली होती. तोपर्यंत ठाकरे हिंदुत्ववादी होते. मात्र आता महाराष्ट्रातील भाजपवाल्यांना हे ढोंग वाटत आहे. शिवसेनेचे हिंदुत्व एखाद्याला ढोंग वाटणे हेच खरं ढोंग आहे, तसे ढोंग भाजपवाले करत आहे. अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपचा समाचार घेतला.

वाडवडिलांची पुण्याई, छत्रपतींचे आशीर्वाद आणि श्रीरामाचा प्रसाद

उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाला पूर्वीइतकेच घट्ट पकडून आहे, काँग्रेसच्या सोबत राहूनही त्यांनी हिंदुत्वाच्या दुधात मिठाचा खडा पडू दिला नाही याच पोटदुखीने राज्यातील विरोधक बेजार झाले आहे. दिल्लीप्रमाणे नागरिकता कायद्यावरून महाराष्ट्रात हिंसा व्हावी असे राजयोतील विरोधकांना वाटत होते, पण उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या पोटदुखीवर असा इलाज केला की, राज्यात साधी ठिणगीही पडू दिली नाही. हि सर्व वाडवडिलांची पुण्याई, छत्रपतींचे आशीर्वाद आणि श्रीरामाचा प्रसाद आहे. त्याच भावनेतून मुख्यमंत्री ठाकरे हे अयोध्येत जाऊन श्रीरामचरणी नतमस्तक झाले.

अयोध्या कुणा एकाची मक्तेदारी नाही

चांदमियां पाटील वगैरेंच्या छातीत राम आहे. मग इतरांना काय छात्या नाहीत/ पण बहकलेला, निराश झालेला विरोधी पक्ष काय बोलतो आणि कसा वागतो ते त्यांनाच माहित! “शिवसेनेने भाजपचा त्याग केलाय, हिंदुत्वाचा नाही. या एका ठोशाने उद्धव ठाकरे यांनी सगळ्यांचेच दात घशात घातले. हा ठोसा मारण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी जागा निवडली ती अयोध्येची. अयोध्या म्हणजे कुणा एकाची मक्तेदारी नाही. कुणी सरकार स्थापनेसासाठी इकडे गेला काय तिकडे गेला काय? रामावर ज्यांची श्रद्धा आहे त्या सगळ्यांचीच अयोध्या. कैकयीमुळे श्रीराम वनवासात गेले, पण तिचा पुत्र भरत हा रामभक्त होता. तशी विचारधारा कुठलीही असली तरी रामभक्ती आड येऊ शकत नाही. पुन्हा फक्त वाल्याचे वाल्मिकी बनविण्याचे वाॅशिंगमशीन राजकारणात आणले म्हणजे रामायण समजते असे होत नाही, असा टोला लगावला.