सरसंघचालक ‘असं’ कधीच म्हणणार नाहीत, शिवसेनेचा भाजपवर निशाणा

मुंबई: : पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या (CM, Shiv Sena chief Uddhav Thackeray) शिवसनेच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर टीका करणाऱ्या भाजप नेत्याना शिवसेनेनं सामनामधून प्रत्युत्तर दिले आहे. सरसंघचालक व शिवसेना पक्षप्रमुखांची भाषणे हिंदुत्वाला (hindutva)व राष्ट्रीय ऐक्याला दिशा देणारीच होती. हिंदुत्व हे केवळ थाळ्या, घंटा बडवण्यापुरते नाही तसे दाढी-मिश्यांपुरते मर्यादित नाही, अशा शब्दांमध्ये सामनामधून भाजपवर शरसंधान साधले आहे. ज्यातील मंदिर सुरू करण्यावरून भाजप वारंवार शिवसेनेला लक्ष्य करत आहे. त्यावरून कोरोनाची पर्वा न करता सर्व मंदिरे खुली करा, असे सरसंघचालक मोहन भागवत (rss-chief-mohan-bhagwats) कधीच म्हणणार नाहीत, असेही सेनेने म्हटले आहे.

मेळाव्यात मुख्यमंत्री ठाकरे यांनी भापवर घणाघाती हल्ला चढवला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, कंगना राणौतवरही ठाकरे बरसले. यानंतर काल दिवसभर भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका केली. शिवसेनेने हिंदुत्व गुंडाळून ठेवल आहे, सावरकरांबद्दल मुख्यमंत्र्यांनी एकही शब्द काढला नाही, अशी टीका भाजप नेत्यांनी केली. त्या टीकेला शिवसेनेने सामनामधून समाचार घेतला आहे.

सामना अग्रलेखातील ठळक मुद्दे
1) दसरा मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदुत्वाची व्याख्या स्पष्ट करून सांगितली आहे. संघाच्या दृष्टिकोनातून हिंदुत्वाचा अर्थ व्यापक असून पूजा पद्धतीशी जोडून त्याला संकुचित करण्याचा प्रयत्न केला आहे. हिंदुत्व हे देशाच्या स्वत्वाचे सार असल्याची भूमिका भागवत यांनी मांडली. हिंदुत्व ही जणू आपलीच मक्तेदारी, जे भाजपबरोबर नाहीत ते हिंदू नाहीत अशा विकृत विचारसरणीपर्यंत काही ठेकेदार पोहोचले असतानाच सरसंघचालकांनी त्या ठेकेदारांचे दात नागपुरात घशात घातले आहेत.

2) मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी भाजपातील हिंदुत्वाच्या राजकीय ठेकेदारांना सुनावले आहे की, हिंदुत्व म्हणजे काय ते सरसंघचालकांकडून शिका. यावर पुढे जाऊन ठाकरे यांनी खडसावले आहे की, घंटा बडवणं, थाळ्या पिटणं हे आमचं हिंदुत्व नाही . मुंबईला पाकव्याप्त कश्मीरची उपमा देणाऱ्या नटीचा आदरसत्कार करणे हे काही आमच्या हिंदुत्वात बसत नाही. मुख्यमंत्री ठाकरे यांनी मारलेला हा टोला राजभवनाला अस्वस्थ करणारा आहे.

3) राज्यपाल श्रीमान भगतसिंग कोश्यारी यांनी संघाची काळी टोपी घालून ठाकरे यांना हिंदुत्वाचे धडे देण्याचा प्रयत्न करून पाहिला. महाराष्ट्रातील मंदिरे उघडणार की नाही? तुम्ही हिंदुत्व सोडले आहे काय? तुम्ही सेक्युलर झालात काय? असे प्रश्न राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना विचारले. त्यास ठाकरे यांनी खणखणीत उत्तर दिलेच, पण आता सरसंघचालकांनीही यावर खडे बोल सुनावले आहेत.

4) भाजपातील हिंदुत्ववाद्यांनी गाईवरून हिंदू-मुसलमानांत दंगली भडकवल्या व राजकारण केले. माय मरो आणि गाय जगो हे आमचे हिंदुत्व नाही. महाराष्ट्रात गोमाता आणि गोव्यात जाऊन खाता हेच का तुमचे हिंदुत्व? असा टोला ठाकरे यांनी भाजपला लगावला. भाजपशासित अनेक राज्यांत गाई कापल्या जातात व खाल्ल्या जातात हे वास्तव आहे. त्यामुळे भाजपचे गाईचे हिंदुत्व तकलादू आहे.ठाकरे यांनी त्या तकलादू भूमिकेची चिरफाड करत लक्तरे वेशीवर टांगली.

5) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची मातृसंस्था आहे. त्यामुळे सरसंघचालक काय सांगतात ते अनेकदा दिशादर्शक ठरते.अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन झाले, त्या सोहळ्यास सरसंघचालक मोहन भागवत विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. अयोध्येत राममंदिर व्हावे ही संघाची भूमिका होतीच, पण ‘कोरोनाची पर्वा न करता सर्व मंदिरे खुली करा, असे भागवत कधीच सांगणार नाहीत. मंदिरांत गर्दी झाली तर महामारीचे संकट वाढेल असा विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवणाऱ्यांपैकी सरसंघचालक आहेत. घंटा बडवून, थाळ्या वाजवून कोरोना पळून जाणार नाही. त्यासाठी आरोग्यविषयक कठोर नियम-शिस्तीचे पालन करावेच लागेल, लसीवर संशोधन करावेच लागेल असे मानणारे सरसंघचालक आहेत.

6) उत्तर प्रदेशात परवानगीशिवाय दाढी ठेवली या कारणाखाली एका पोलीस फौजदाराला सरकारने निलंबित केले. त्याचे तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी स्वागत केले, पण राजकारणात, केंद्रीय मंत्रिमंडळात अनेकांनी दाढी अभिमानाने ठेवलीच आहे. चापेकर बंधूंना दाढी नव्हतीच, पण तीनही चापेकर बंधू हसत हसत देशासाठी फासावर गेले. अशा मर्दानगीची अनेक उदाहरणे आहेत.