मंदिर पुन्हा कुलूपबंद : शिवसेनेचा भाजप, आरएसएस आणि विहिंपवर निशाणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राम मंदिर निर्माण प्रश्नांवर भाजप, आरएसएस आणि विहिंपवर निशाणा साधला आहे. राममंदिराचा विषय हिंदुत्ववादी संघटनांनीच गुंडाळून ठेवला आहे. कोलकात्यात अमित शहांची रथयात्रा रोखली म्हणून तेथे हिंदुत्वाचा हुंकार दिला जातो, पण अयोध्येतील राममंदिराचा विषय मात्र कुलूपबंद केला जातोय. २०१९ च्या निवडणुकीत राममंदिरचा मुद्दा मोदी परिवाराला अडचणीचा ठरू नये. यासाठी संघ परिवाराने ही भूमिका घेतली आहे काय?, असा सवाल शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून उपस्थित  केला आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे –
‘एकंदरीत प्रभू श्रीरामांचा वनवास संपायची लक्षणे दिसत नाहीत. विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मंदिराचा विषय टाळावा ही त्यांची मजबुरी असेल किंवा अंतर्गत बाब. शेवटी सोयीसाठी चुली वेगळ्या असल्या तरी एकमेकांशी ठरवूनच त्यांचे विषय मागे किंवा पुढे केले जातात. कोलकात्यात अमित शहांची रथयात्रा रोखली म्हणून तेथे हिंदुत्वाचा हुंकार दिला जातो, पण अयोध्येतील राममंदिराचा विषय मात्र कुलूपबंद केला जातोय.’
राममंदिराबाबतची भूमिका स्पष्ट करा-
एनडीएतील नितीश कुमार, रामविलास पासवान यांची राममंदिराबाबतची भूमिका नेमकी काय? त्यांना राममंदिर हवे की नको? हे दोन्ही नेते ‘बाबरी’वादी आहेत. म्हणूनच आज भाजपाकडे बहुमत आहे. तेव्हा आजच हा विषय धसास लावा ही सेनेची मागणी आहे.
श्रीरामांचा वनवास सुरूच –
सरकारने वादग्रस्त नसलेल्या ६२ एकर जागेचा विषय कोर्टाकडे नेला आहे. ही जमीन वादग्रस्त नसल्याने रामजन्मभूमी न्यासाकडे देण्याची परवानगी कोर्टाकडे मागितली. मुळात या जमिनीचे अधिग्रहण सरकारने केले व जागा केंद्राकडेच आहे. त्यामुळे कोर्टाला न विचारता या ६२ एकर जमिनीचा ताबा परस्पर रामजन्मभूमी न्यासाकडे द्यायला हरकत नव्हती, पण सरकारने त्यासाठी कोर्टाची परवानगी मागितली. एकंदरीत प्रभू श्रीरामांचा वनवास संपायची लक्षणे दिसत नाहीत.
विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मंदिराचा विषय टाळावा ही त्यांची मजबुरी असेल किंवा अंतर्गत बाब. शेवटी सोयीसाठी चुली वेगळय़ा असल्या तरी एकमेकांशी ठरवूनच त्यांचे विषय मागे किंवा पुढे केले जातात. शेवटी हिंदुत्वापासून प्रभू श्रीरामापर्यंत सगळेच कट सोय म्हणून केले जातात. निवडणुकीनंतर मंदिराचे पाहू असे बोलणे म्हणजे शरयूत ज्यांनी रक्त, बलिदान दिले त्यांच्या बलिदानास नाकारण्यासारखे आहे.अशा शब्दांमध्ये शिवसेनेनं राम मंदिरावरुन भाजपा आणि संघ परिवाराचा जोरदार समाचार घेतला आहे.