बिहार निवडणूकीतील विजयाचे श्रेय फडणवीसांना देणाऱ्या भाजपला शिवसेनेचा ‘हा’ सल्ला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बिहार विधानसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारल्यामुळं भाजपच्या गोटात सध्या आनंदाचं वातावरण आहे. बिहार निवडणुकीचे प्रभारी असलेले देवेंद्र फडणवीस यांनाही विजयाचं श्रेय दिलं जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून बिहारमधील घडामोडींवर भाष्य करताना महाराष्ट्रातील नेत्यांना चिमटे काढले आहेत.

शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून बिहारमधील घडामोडींवर केलेलं भाष्य
बिहारच्या विजयाचं श्रेय महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्याला दिलं जात आहे. याचा आम्हाला आनंद आहे. हा आनंद भाजपनं पुढची चार वर्षे साजरा करावा आणि बिहारला विकासाच्या दिशेनं नेण्यासाठी महाराष्ट्रातील अनुभवी भाजप नेत्यांची मदत घ्यावी. त्यामुळं बिहारला फायदा होईल आणि महाराष्ट्रातही शांतता नांदेल.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून हे सरकार पडण्याची भाकितं भाजपचे नेते करत असतात. महाराष्ट्रात वर्षभरापूर्वी जो पचका झाला त्याचे दु:ख विसरायलाच महाराष्ट्राचे नेते सध्या बिहारला असतात. बिहारचे सरकार पाच वर्षे टिकेल असा आत्मविश्वास ते व्यक्त करतात, त्याच वेळी महाराष्ट्रातील सरकार अस्थिर असून ते फार काळ चालणार नाही अशी खदखद व्यक्त करतात. हे ढोंग आहे.

देवेंद्र फडणवीस हे निवडणूक काळात बिहारचे प्रभारी होते. फडणवीस यांना बिहार सरकारकडेच जास्त लक्ष द्यावे लागेल अशी चिन्हे दिसत आहेत. महाराष्ट्रात चंद्रकांत पाटलांसारखे नेते अधूनमधून काही पुड्या सोडत असतात आणि महाराष्ट्राचे राज्य शरद पवार चालवत असल्याचे टोमणे मारत असतात. महाराष्ट्राचे राज्यपालही त्याच मताचे आहेत. या सगळ्यांनी यापुढे आता बिहारात नितीशकुमारांचे राज्य नक्की कोण चालवेल यावर नजर ठेवली पाहिजे. बिहारातील भाजप-जदयु सरकारचे बहुमत फक्त दोन-तीन आमदारांचं तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडील बहुमत तिसेक आमदारांचं आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील सरकार पाडण्याची भाषा करणं म्हणजे दगडी भिंतीवर डोके फोडून घेण्यासारखं आहे.