मी जातीचे राजकारण करत नाही : आढळराव पाटील

शिरुर : पोलीसनामा ऑनलाईन – शिरुर लोकसभा मतदार संघात जातीचे राजकारण केले जात असल्याची चर्चा होत आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वक्तव्यामुळे या चर्चेला सुरुवात झाली आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अभिनेते अमोल कोल्हे यांची जात काढली होती. अमोल कोल्हे हे मराठी नसून माळी आहेत, असं आढळराव पाटलांनी म्हटलं होते. त्यावरून शिरुर मतदार संघात चर्चांनी जोर धरला आहे.

आता मात्र शिवाजीराव आढळराव पाटील यांनी त्यांच्या वक्तव्यावर सारवासारव केली आहे. काही पत्रकरांनी मला विचारलं की, शिरुर मतदारसंघात मराठा समाजाचा तगडा उमेदवार देणार अशी राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीती आहे. मी त्यांना विचारलं असा कोण आहे मराठा समाजाचा उमेदवार… त्यावर पत्रकारांनी अमोल कोल्हे यांचं नाव सांगितलं. पत्रकारांच्या या उत्तरावर मी एवढंच म्हणालो की अमोल कोल्हे माळी समाजाचे आहेत मराठा नाही. तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे’, असं शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितलं.

आता राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी मी जातीचं राजकारण करत असल्याची उलट सुलट चर्चा सुरु केली आहे. शिवसेनेत कधीही जातीचं राजकारण नसतं, मला बाळासाहेबांची शिकवण आहे. मी शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांना मानणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी कोणाच्याही जातीचा उल्लेख करत नाही. माझ्यासाठी सगळ्या जाती समान आहेत. सगळ्यांबद्द्ल आदर आहे. मी कधी जातीचं राजकारण केलं नाही. राष्ट्रवादीने माझ्याविरोधातील खोटा प्रचार थांबवावा’, असं शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटलं आहे.