निवडणुकीच्या तोंडावर शिवसैनिकांचे सामुहिक राजीनामे
पक्षप्रमुख ठाकरे रविवारी उस्मानाबादेत
उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचा उमेदवार ऐनवेळी बदलण्यात आला. विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना डावलून माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्याचवेळी उमरगा आणि लोहारा तालुक्यातील शिवसैनिकांनी जाहीररित्या आपली नाराजी व्यक्त केली होती. मुंबई येथे शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीसमोर जावून उमेदवार न बदलल्यास सामुहिक राजीनामे देणार असल्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला होता. त्यानंतर मागील काही दिवसांत शांत असलेल्या उमरगा आणि लोहारा तालुक्यातील शिवसैनिकांनी निवडणुकीच्या चार दिवस अगोदर राजीनाम्याचे शस्त्र उगारले आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यांना पत्र लिहून आपण सामुहिक राजीनामे देत असल्याचे त्यावर नमूद करण्यात आले आहे. चालू लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी उमरगा तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व निष्ठावंत शिवसैनिकांनी कुठल्याही निवडणूक प्रक्रियेची अथवा कार्यक्रमाची माहिती न देता मनमानीपणा सुरू केला असल्याचे त्यात म्हटले आहे. उमरगा आणि लोहारा तालुक्यातील शिवसैनिकांना विश्वासात न घेता उमेदवारी दाखल केल्यापासून आजपर्यंत जाणूनबुजून सर्व प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण सामुहिक राजीनामे देत असल्याचे या पत्रात म्हटले आहे. त्यावर शिवसेनेचे उमरगा तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, डिग्गी विभागाचे उपतालुकाप्रमुख शेखर पाटील, येणेगूर विभागाचे उपतालुकाप्रमुख दिपक जोमदे, गुंजोटीचे उपतालुकाप्रमुख मोहयोद्दीन सुलतान, मुरूम विभागाचे उपतालुकाप्रमुख शेखर मुदकण्णा, तुरोरीचे उपतालुकाप्रमुख सुधाकर पाटील यांची स्वाक्षरी आहे.
राजीनामा मिळाला आहे : जिल्हाप्रमुख पाटील