संजयकाका पाटलांकडून दुष्काळग्रस्तांची फसवणूक : शिवसेना

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भाग म्हणून जतची ओळख आहे. जत तालुक्यातील पाण्याचा प्रश्न निवडणूकीच्या निमित्ताने ऐरणीवर आला आहे. दुष्काळी गावांना पाणी देता येत नसेल, तर संजयकाका पाटलांनी निवडणूकीतून माघार घ्यावी, असे शिवसेनेने म्हटले आहे. तसेच निवडणूक डोळ्यासमोर ठेवून संजयकाका पाटील हे केवळ दुष्काळग्रस्तांची फसवणूक करत आहेत, असा आरोपही शिवसेनेकडून करण्यात आला.

जत तालुक्यातील ४२ गावांच्या पाणी प्रश्नाच्या श्रेयवादावरून भाजपाचे खासदार संजयकाका पाटील आणि शिवसेनेमध्ये जुंपली आहे. काही दिवसांपूर्वी खासदार संजयकाका पाटील यांनी, या ४२ गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहे. यासाठी तरतुदही करण्यात आल्याची माहिती देत पाणी प्रश्न आपण सोडवणार असल्याची ग्वाही दिली होती. यावर शिवसेनेने खासदारांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे. त्याविषयी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी आज पत्रकार परिषद घेतली. पाणी प्रश्नावरून संजयकाका पाटील हे केवळ खोटं बोलण्याचा उद्योग करत आहे असा आरोप विभुतेनी यावेळी केला.

संजय विभूते म्हणाले की , ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जातीने या प्रश्नाकडे लक्ष घालून, हा पाणी प्रश्न निकालात काढण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. आता पाणी येण्याचे चित्र निर्माण झाले असताना, खासदार केवळ श्रेय घेण्यासाठी पुढे आले आहेत. संजयकाका पाटील यांचा हा उद्योग म्हणजे दुसऱ्याच्या पोराला आपले म्हणण्याचा प्रकार आहे. भाजपने केवळ गाजर दाखवण्याचे काम केले आहे. ‘

तसेच खासदारांनी जर पाण्याचा प्रश्न सोडवल्यास त्यांचा जाहीर सत्कार करू नाहीतर पाणी प्रश्न सोडवता येत नसेल, तर खासदार पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घ्यावी, असे आवाहन यावेळी विभूतेंकडून करण्यात आले.