मला दुचाकीची सवय नाही, पण 3 चाकी सरकार चालवतोय : उध्दव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मला दुचाकी चालवण्याची सवय नाही, मात्र सध्या तीनचाकी सरकार चालवतो आहे असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. विरोधकांकडून महाविकास आघाडीचे सरकारवर टीका करताना हे तीनचाकी सरकार असल्याचा वारंवार उल्लेख केला जातो. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांनी एकत्रित सरकार स्थापन केल्याने ही टीका करण्यात येत आहे.

त्यामुळे हे सरकार टिकणार नाही असा वारंवार दावा विरोधकांकडून केला जातो. विरोधकांच्या या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 31 व्या राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या कार्यक्रमात उत्तर दिले आहे.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आमच्यावर तीनचाकी सरकार असल्याची टीका होत आहे. तीनचाकी तर तीनचाकी… आमचं सरकार चालत आहे ना हे महत्त्वाचे आहे. समतोल जमला पाहिजे मग दोन चाकं असो किंवा तीन चाकं. चार चाकं असूनही आपटायचे ते आपटलेच आहेत असा टोला त्यांनी यावेळी लगावला. जो चालवणारा असतो त्याच्या हातातील चाक महत्त्वाचं असतं. ते खरं नियंत्रण करत असतं. त्या चाकावर गाडी चालत असते. त्या चालवणाऱ्याला सगळे नियम सांगणं महत्त्वाचं, असेही ते म्हणाले.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकार तीनचाकी ऑटो रिक्षाप्रमाणे असल्याची टीका केली होती. दोन चांक असणारं वाहन धावतं मात्र तीनचाकी ऑटो रिक्षाप्रमाणे असणाऱ्या सरकारची चाकं तीन दिशेला धावली तर काय होईल असा टोला त्यांनी लगावला होता.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/