शरद पवारांमुळे कमी आमदारांत सरकार स्थापन करण्याचा ‘चमत्कार’ : CM ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सरकार आणण्यात शरद पवार यांचा चमत्कार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. वसंदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या 43 व्या वार्षिक सर्व साधारण सभा आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी यावेळी पुरस्कार मिळवणाऱ्या शेतकऱ्यांचे कौतुक करताना तुम्ही ज्याप्रमाणे कमी जागेत जास्त पीक घेतलं, त्याप्रमाणे शरद पवारांसोबत आम्ही कमीत कमी आमदारांमध्ये सरकार स्थापन करण्याचा चमत्कार करुन दाखवला असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

जागा जास्त आहे, आमचंच पीक येणार असं कोणी आता म्हणू शकत नाही. आम्ही कमी जागांमध्ये तुमच्यावर मात करु शकतो हे दाखवून दिले आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे. सहकार क्षेत्र आणि राजकारण वेगळं केलं जाऊ शकत नाही. कारण अनेक राजकीय नेत्यांनी सहकार क्षेत्र मजबूत केले आहे. साखर कारखानदारी आणि साखर क्षेत्रात अनेक नेते दिले आहेत, असेही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी ऊसाचा रस पिण्याची आठवण सांगितली. आम्ही शाळेत जायचो तेव्हा रस्त्यावर ठिकठिकाणी ऊसाचा रस पिण्यासाठी मिळायचा. ऊसाची गुऱ्हाळं नाक्यावर असायची. ऊनात गार ऊसाचा रस पिऊन बरं वाटायचं. पण गुऱ्हाळात एका बाजूने गेलेला रसरशीत ऊस दुसऱ्या बाजूने चिपाड होऊन बाहेर पडतोय याकडे आमचे लक्ष नसायचं. आज ग्रामीण अर्थव्यवस्था शेतकऱ्यांवर अवलंबून आहे. दुसऱ्याच्या आयुष्यात गोडवा वाटत असताना शेतकऱ्यांच्या आयुष्यात चिपाड होत आहे. जर आम्ही राज्यकर्त्यांनी याकडे लक्ष दिलं नाही तर या कार्यक्रमाला काही अर्थ नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/