राज्यातील सत्तापेच कायम ! ‘महाशिवआघाडी’नं राज्यपालांची भेट पुढं ढकलली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी बोलणी सुरु असतानाच राज्यपालांची ठरवलेली भेट पुढे ढकलण्यात आल्याने सत्ता स्थापनेचा सस्पेन्स अजून वाढला आहे. राज्यात अवकाळी पावसाने शेतकरी परेशान असताना शिवसेनेकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत मात्र राज्यपालांशी बैठक पुढे ढकलल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

राज्याची सध्याची परिस्थिती लक्षात घेता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते शनिवारी दुपारी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेणार होते. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असल्यामुळे प्रशाकीय काम बंद आहेत याच पार्श्वभूमीवर राज्यपालांना भेटणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले होते.

सत्ता स्थापनेबाबत रविवारी अंतिम निर्णय होणार आहे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात चर्चा झाल्यानंतर सरकार स्थापनेचा निर्णय होईल. काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी शुक्रवारी म्हटलं की, फक्त काँग्रेस काही ठरवू शकत नाही. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात चर्चा झाल्यानंतर पुढची वाटचाल ठरेल.

एकत्र निवडणूक लढवणाऱ्या भाजप-सेनेमध्ये निकालानंतर मात्र मुख्यमंत्रिपदावरून मतभेद निर्माण झाले. त्यानंतर शिवसेनेसोबत सरकार स्थापण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जोरदार हालचाली सुरू आहेत. तीनही पक्षांच्या बैठकीत सम समान पदावर बोलणी झाल्याचे समजते. मंत्रिपदाबाबत शिवसेनेनं 16- 14- 12 च्या फॉर्म्युला मांडला आहे. तर तीनही पक्षांना समान म्हणजेच 14-14-14 अशा फॉर्म्युल्यासाठी काँग्रेस आग्रही असल्याचं समजत आहे. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात मुख्यमंत्रिपद अडीच अडीच वर्षांसाठी असेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Visit : Policenama.com