‘गलवान’ व ‘पेंगाँग’ विजय दिवसही साजरा होऊ द्या ! शिवसेनेचा PM मोदींना खोचक सल्ला

पोलिसनामा ऑनलाईन टीम – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’मधून कारगिल विजय दिनाच्या घटनांना उजाळा दिला होता. त्याचबरोबर पाकिस्तानबद्दल भाष्य केले होते. ‘मन की बात’वर शिवसेनेने टीकेचा बाण सोडला असून, पाकिस्तानबरोबर चीनची आठवण करून दिली आहे. कारगिल विजय दिवसाबरोबर ‘गलवान’ व ‘पेंगाँग’ विजय दिवसही साजरा होऊ द्या ! कारगिल विजय दिवसाचा हाच संदेश आहे, असे म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून पाकिस्तानचा स्वभावच वाईट असल्याचे स्पष्ट केले होते. यावर शिवसेनेने मोदी यांच्या भूमिकेवर सामनातून भाष्य केले आहे. पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक वगैरे करूनही त्यांचे शेपूट वाकडे ते वाकडेच. यावर पंतप्रधान मोदी यांनी असे लॉजिक मांडले की, ‘पाकिस्तान दुष्ट आहे. दुष्टांचा स्वभाव काही केल्या आपण बदलवू शकत नाही. दुष्ट स्वभावाची माणसे काही कारणाशिवाय कोणाशीही वैर घेतात. वैर घेणे हा त्यांचा स्वभावच असतो.

हिंदुस्थानने पाकिस्तानबरोबर नेहमीच मैत्रीचा हात पुढे केला. मात्र पाकिस्तानने हिंदुस्थानच्या पाठीत खंजीर खुपसण्याचाच प्रयत्न केला.’ पंतप्रधान मोदी यांनी सत्य तेच सांगितले. पण हेच ‘मैत्रीचा हात’ प्रकरण चीनच्या बाबतीतही लागू पडते. दुष्टपणा त्यांच्या वाकड्या नजरेतही स्पष्ट दिसतो. पण ते वाकडे डोळे काढून त्यांच्या हातात देण्याचे शौर्य आता गाजवायला हवे. आजार बळावला आहे. तो टोकास जाण्याआधीच पंतप्रधानांनी शस्त्रक्रिया करावी हे बरे. कारगिल विजय दिवसाबरोबर ‘गलवान’ व ‘पेंगाँग’ विजय दिवसही साजरा होऊ द्या! कारगिल विजय दिवसाचा हाच संदेश आहे.