बारामतीत परिवर्तन अटळ ; ‘सेल्फी ताई गल्‍ली मै, कूल ताई दिल्‍ली मै’ : विजय शिवतारे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी एकमेकांवर झाडल्या जात आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा देशाची सत्‍ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात जाणार असून राज्यातील महायुतीचे सर्व उमेदवार दिल्‍लीत जावुन प्रतिनिधित्व करणार आहेत. यंदा बारामती मतदारसंघात परिवर्तन अटळ असून ‘सेल्फी ताई गल्‍ली मै, कूल ताई दिल्‍ली मै’ अशा खोचक शब्दात शिवसेना नेते आणि राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी बारामती मतदार संघातील आघाडीच्या उमेदवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला.

बारामती लोकसभा मतदार संघातून महायुतीच्या कांचन कूल यांना प्रचंड बहुमताने निवडुन आणणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितते. आज (मंगळवारी) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेवुन महायुतीचे पुण्यातील उमेदवार आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या पत्रयात्रेला सुरूवात झाली. कसबा गणपती, फडके हौद चौक, दारूवाला पुल, नरपतगिरी चौक आणि तेथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा काढण्यात आली होती. कांचन कुल यांनी पालकमंत्री गिरीश बापट, महसुल मंत्री चंद्रकांत पाटील आणि महादेव जानकर यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज भरला. महायुतीतर्फे नरपतगिरी चौकात सभा घेण्यात आली. यावेळी राज्यमंत्री दिलीप कांबळे, शिवसंग्राम पक्षाचे विनायक मेटे, राज्यसभा खासदार संजय काकडे, खासदार अनिल शिरोळे यांच्यासे भाजप व शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

बारामती लोकसभा मतदार संघाकडे संपुर्ण राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. बारामती मतदार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्‍ला आहे. यंदाच्या निवडणुक राष्ट्रवादीचा हा बालेकिल्‍ला शाबुत राहणार की ढासळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बारामती लोकसभा मतदार संघात प्रचार सभा घेणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे बारामतीची निवडणुक ही निश्‍चितच लक्षवेधी ठरणार आहे.