नटीला भाजपाचा पाठिंबा मिळणे हे दुर्दैवी : खा. संजय राऊत

पोलिसनामा ऑनलाईन – मुंबईचा अपमान करणार्‍या नटीच्या मागे भाजप उभा राहतो हे दुर्दैवी आहे असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मांडले आहे. सामानाच्या रोखठोक सदरात एक लेख लिहून त्यांनी कंगना रणौत, भाजपवर खास शैलीत टीका केली आहे.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईस ग्रहण लावण्याचे प्रयत्न पुन्हा सुरु झाले आहेत.त्यांना बळ देण्यासाठी परंपरेप्रमाणेच आपल्यातलेच घरभेदी सरसावले आहेत. मधल्या काळात मुंबईस पाकिस्तान म्हटले गेले. मुंबईचा अपमान करणार्‍या एका नटीच्या बेकायदेशीर बांधकामावर मुंबई महापालिकेने कारवाई केली तेव्हा महापालिकेचा उल्लेख बाबर असा करण्यात आला. मुंबईला आधी पाकिस्तान आणि नंतर बाबर म्हणणार्‍यांमागे भारतीय जनता पक्ष उभा राहतो हे दुर्दैवच म्हणायला हवे. मुंबई विरोधा 60-65 वर्षांपूर्वी काँग्रेसच्या काही नेत्यांनी पद्धतशीर कारस्थाने केली. त्या कारस्थानांच्या छाताडावर पाय ठेवून मराठी माणसाने भगवा झेंडा फडकवला. भाजपाचे एक प्रमुख नेते आशिष शेलार यांचे असे म्हणणे आहे की ‘ज्या काँग्रेसने मराठी आंदोलकांवर गोळ्या झाडल्या त्यांच्यासोबत शिवसेना सत्तेत आहे.’ भाजपनेत्यांचा इतिहास कच्चा असून एक नटी मुंबईत बसून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याविरुद्ध एकेरी भाषा बोलते. आव्हानाची भाषा करते व त्यावर महाराष्ट्राच्या जनतेने काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही हे कसले एकतर्फी स्वातंत्र्य? तिच्या बेकायदेशीर बांधकामावर हातोडा पडला तेव्हा हे तर माझे राम मंदिरच होते असा कांगावाही तिने केला. पण हे बेकायदेशीर बांधकाम तिने कायद्याचे उल्लंघन करुन ती सांगत असलेल्या पाकिस्तानात बांधले. मुंबईला ‘पाकिस्तान’ म्हणायचे व या ‘पाकिस्ताना’तल्या बेकायदेशीर कामांवर सर्जिक स्ट्राईक केला की छाती पिटायची, हा कसला खेळ? असा सवाल राउत यांनी उपस्थित केला आहे.