फडणवीस यांना महाराष्ट्रासोबत झालेला सापत्नभाव पटेल काय? – शिवसेना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  तौक्ते वादळाने अनेक राज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ गुजरात राज्याचा दौरा करत आर्थिक मदत जाहीर केली. यामुळे केवळ महाराष्ट्रच नव्हे तर इतर राज्यांना सापत्नभाव मिळत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांकडे मोदी दुर्लक्ष करत असल्याची टीका सध्या सुरू आहे. दरम्यान शिवसेनेनेही हाच मुद्दा उचलत सामनाच्या अग्रलेखात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे मदत मागितली पाहिजे असे मत व्यक्त केले आहे. त्याचबरोबर फडणवीस यांना महाराष्ट्रासोबत झालेला सापत्नभाव पटेल काय? असा सवालही उपस्थित केला आहे.

काय म्हंटले आहे सामनाच्या अग्रलेखात

वादळानंतर पंतप्रधान मोदी यांना गुजरातच्या हवाई मार्गाने गोव्याची पाहणी करता आली असती मात्र त्यांचे वागणे भेदभावाचे आहे. महाराष्ट्राला मदत न करण्याची त्यांची भूमिका धक्कादायक असल्याचे मत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मांडले. दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तत्काळ कोकण दौऱ्यावर गेले. नुकसानीची पाहणी केली. स्थानिकांशी व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर लगेचच फडणवीस यांनी नुकसानग्रस्तांना राज्य सरकारने भरघोस मदत करावी अशी मागणी केली. परंतु हीच मागणी फडणवीस यांनी जोरकसपणे केंद्राकडे केली पाहिजे अशी अपेक्षा शिवसेनेने व्यक्त केली आहे.

फडणवीस हे राज्याचे नेते असून त्यांनी पक्ष वगैरे बाजूला ठेऊन मोदी साहेबांकडे गुजरातच्या बरोबरीने महाराष्ट्राला आर्थिक मदत मागितली पाहिजे. चोवीस तासात गुजरातला हजार कोटी आणि महाराष्ट्राला काहीच नाही हा सापत्नभाव फडणवीस यांना तरी पटेल का? अशी विचारणाही शिवसेनेने अग्रलेखातून केली आहे.
वादळाचा तडाखा कोकणातील मासेमारी व्यवसाय, शेती, फळबाग यांना बसला आहे. कोरोनामुळे आधीच हे व्यवसाय ठप्प झाला. त्यातच हे वादळ. सावंतवाडी, तारकर्ली, मालवण, देवबाग, अलिबाग, वसई, विरार, केळवे, माहीम समुद्रपट्टीवरील पर्यटन व्यवसाय जमीनदोस्त झाला आहे. येथील हजारो लोकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्वांची महाराष्ट्र सरकार काळजी घेईलच पण केंद्र सरकारने गोवा आणि महाराष्ट्रच्या बाबतीत भेदभाव का करावा? असा सवालही शिवसेनेने अग्रलेखातून विचारला आहे.