संजय राऊतांचा सामनामधून रोखठोक निशाणा, म्हणाले – ‘PM मोदी-शाह यांना आता बदलावं लागेल’

पोलीसनामा ऑनलाइन – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जीच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने सलग तिस-यांदा दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपाने बंगालमध्ये लावलेला जोर आणि केलेले दावे त्या तुलनेत त्यांना मिळालेल्या 77 जागा म्हणजे फारच कमी आहेत. त्यामुळे हा मोदींचा नैतिक पराभव असल्याची टीका राजकीय विश्लेषक करत आहेत. आता याच मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊतांनी सामनाच्या रोखठोक या सदरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह अन् भाजपाच्या धोरणांचा समाचार घेतला घेतला आहे. बंगाली जनतेला जय श्रीरामचा नारा आणि धार्मिक फाळणीचा विचार पटला नाही. आपली भाषा, संस्कृती, स्वाभिमानावर ही जनता प्रेम करते. प्रसिद्धी माध्यमांचा धुरळा उडवून समाजमाध्यमांवर विरोधकांचा खोटा प्रचार आणि बदनामी ही शस्त्र आता जुनाट आणि बोथट झाली. याच न्यायाने उद्या मोदी आणि शाहांच्या प्रतिमांना गंज चढेल. ते होऊ द्यायचे नसेल तर त्यांना स्वतःला बदलावे लागेल, असे राऊत यांनी म्हटले आहे.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी मांडलेल्या मुद्द्याचे रॅकेट उडाले असे राऊतांनी म्हटले आहे. हिंदी भाषिक रोजीरोटीसाठी मोठ्या प्रमाणावर पश्चिम बंगालमध्ये आले आहेत. जय श्रीरामच्या गर्जनेचे त्यांना आकर्षण वाटले. ममता बॅनर्जींनी या हिंदी भाषिक मतांकडे पूर्ण दुर्लक्ष करून स्थानिकांना भावनिक साद घातली. बाहेरचे लोक येऊन बंगाल बिघडवत असल्याचा त्यांच्या प्रचाराचा पहिला मुद्दा. बंगालचा आम्ही गुजरात होऊ देणार नाही, हा दुसरा मुद्दा. या मुद्द्यांचे रॉकेट उडाले अन् त्यात भाजपाची लंका जळाली. बंगालात जय श्रीरामचे आकर्षण कधीच नव्हते. तिथे दुर्गा किंवा कालिमातेचे वलय. भाजपाने श्रीरामास प्रचारासाठी पश्चिम बंगालच्या रस्त्यांवर आणले. पण देवांशू भट्टाचार्य या फक्त 25 वर्षांच्या तरुणाने खेला होबे हे गीत तृणमूलसाठी प्रचारात आणले. त्या खेला होबे ने जय श्रीरामच्या नारेबाजीवर मात केली. खेला होबे म्हणजे आता खेळ होईल. खेला होबेने संपूर्ण पश्चिम बंगालात धुमाकूळ घातला असे देखील राऊत यांनी नमूद केले आहे.
ममता बॅनर्जींची तुलना अहिल्याबाई होळकरांशी
संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांची तुलना अहिल्याबाई होळकरांशी केली आहे. ही विधवा बाई काय राज्य करणार? अस म्हणणाऱ्या दरबारी मंडळींचा प्रमुख गंगोबा तात्या याने राघोबा दादांशी संधान बांधल. राघोबा दादा इंदूरवर चालून गेले. अहिल्याबाईंचा आपल्यासमोर काय निभाव लागणार? इंदूर सहज जिंकू असा विश्वास त्यांना होता. अहिल्याबाईंनी राघोबादादांना निरोप पाठवला की तुम्हाला लढायची खुमखुमी असेल तर मीही तयार आहे. हरलात तर काय होईल. मी बाईमाणूस असल्याने मला कुणी हसणार नाही. पण तुमचा पराभव झाला तर जगास तोंड दाखवायला जागा राहणार नाही. राघोबा दादांना हा निरोप मिळताच त्यांनी मध्य प्रदेशातून काढता पाय घेतला. अहिल्याबाईंच्या लौकिकात भर पडली. पश्चिम बंगालमध्ये याहून वेगळ काय घडल ? असे राऊत यांनी म्हटले आहे.