संजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल, म्हणाले – ‘आता कोणाचा राजीनामा मागणार, शरद पवारांचा की ज्यो बायडनचा ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीत शेतक-यांनी आज काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले असून पोलीस आणि शेतकऱ्यांमधील संघर्ष पेटला आहे. याच दरम्यान शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सरकारचे हे अपयश आहे. या अराजकासाठी दिल्लीत ठरवून पायघड्या घातल्या गेल्या. कोणाचा राजीनामा मागणार? सोनिया गांधी. ममता बॅनर्जी. उद्धव ठाकरे. शरद पवार की ज्यो बायडनचा? इस बात पर त्यागपत्र… राजीनामा तो बनता है साहेब… जय हिंद, असे खासदार राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

ट्रॅक्टर रॅलीदरम्यान आंदोलक शेतकरी दिल्लीतील लाल किल्ल्यावर धडकले आहेत. दुसरीकडे एका आंदोलकाने वेगाने ट्रॅक्टर आणत रस्त्यावर उभ्या पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले आहे. शेतकरी आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणावरून खासदार राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला दोषी ठरवले आहे. सरकार याच दिवसाची वाट पाहत होती का? असा सवाल राऊत यांनी केला आहे. सरकारने शेवटपर्यंत लाखो शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले नाही. ही कुठल्या प्रकारची लोकशाही आमच्या देशात वाढत आहे. ही लोकशाही म्हणता येत नाही. काही औरच चालले आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

खासदार राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, जर सरकारला वाटले असते तर हिंसा थांबवता आली असती. दिल्लीमध्ये जे सुरू आहे त्याचे समर्थन करता येणार नाही. कुणीही असो लाल किल्ला आणि तिरंग्याचा अपमान सहन करणार नाही. मात्र वातावरण का बिघडले. सरकार शेतकरी विरोधी कायदे का रद्द करत नाही आहे. कुठले अदृश्य हात राजकारण करत आहेत, असा सवाल राऊत यांनी विचारला आहे.