‘बहुमत सिद्ध करून द्यायची जबाबदारी घेऊनच काही अधिकारी राबत होते’ : शिवसेना

पोलिसनामा ऑनलाईन टीम – पोलीस खात्यातील काही उच्चपदस्थ अधिकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हवाल्याने काही माध्यमांनी प्रसिद्ध केले होते. या वृत्तावर देशमुख यांनी खुलासा करत चर्चेला पूर्णविराम दिला. याच मुद्यावरून शिवसेनेने भाजपसह पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांवर बाण रोखला आहे.

‘सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करीत शिवसेनेने फडणवीसांसह पोलीस अधिकार्‍यांवर निशाणा साधला आहे. भारतीय जनता पक्षाचे लोक महाराष्ट्र सरकार पाडण्याचा प्रयत्न काल करत होते. प्रशासन हे निवडून येणार्‍या लोकनियुक्त सरकारचे असते. एखाद्या राजकीय पक्षाचे नसते. सरकार बदलताच भलेभले अधिकारी टोप्या फिरवतात. उगवत्या सरकारला त्यांना नमस्कार करावाच लागतो. हे फक्त महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात सर्व स्तरांवर सुरू असते.

सरकार बदलण्याची व पाडण्याची क्षमता त्यांच्यात नाही. जर एखाद्या मंत्र्यास असे वाटत असेल की, अधिकारी सरकार पाडत आहेत तर ते सरकार अत्यंत ढिसाळ पायावर उभे आहे असे जनतेला वाटू शकते. मुळात फडणवीस यांचे सरकार जाणार नाही या भ्रमात येथील प्रशासन निवडणुकीआधी आणि नंतर काही काळ होते. पाच वर्षे फडणवीस व भाजपने एकछत्री अंमल गाजवला. प्रशासनावर फडणवीस सरकारचा अंमल होता व पुनःपुन्हा आम्हीच येणार या विधानाची धुंदी होती. त्यामुळे पोलीस असतील किंवा मंत्रालय, महसूल खाते एकजात सर्व अधिकारी वर्ग त्याच संघधुंदीत गुंग झाला होता. अशी टीका शिवसेनेने केली आहे.