शिवसेनेचा भाजपावर ‘हल्लाबोल’ !

पोलीसनामा ऑनलाइन – कर्नाटक सरकारने बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांचा अश्वारूढ पुतळा रातोरात हटविल्यावरुन शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे. कोणत्याही पक्षाचा आमदार किंवा मुख्यमंत्री हे छत्रपती शिवरायांपेक्षा मोठे नाहीत. त्यामुळे कातडीबचाव फुटकळ खुलासे करण्यात अर्थ नाही. शिवरायांचा पुतळा रातोरात हटवण्याचा प्रकार चिंताजनक आहे. त्याहीपेक्षा महाराष्ट्रातील भाजप ‘शिवभक्तां’चे मौन चिंताजनक असल्याचे म्हणत ‘सामाना’तून भाजपवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे.

शिवराय हे एकमेव हिंदूपदपातशहा

महाराष्ट्रातील मागच्या निवडणुकीत छत्रपती शिवाजीराजांचे आशीर्वाद आपल्याला आहेत असा प्रचार भाजपने केला, पण त्यांच्या कार्यकाळात शिवरायांच्या स्मारकाची वीट रचली गेली नाही. अशा अनेक सोंगाढोंगाच्या गोष्टी सांगता येतील. यांचे शिवरायप्रेम हे ढोंग आहे हे सिद्ध करणारी दुर्घटना बाजूच्या कर्नाटक राज्यात घडली आहे. बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात उभारण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक सरकारने रातोरात हटविला.

शिवाजीराजांनी जगातले पहिले हिंदवी स्वराज्य निर्माण केले. हिंदू राष्ट्र कल्पनेचे जनक म्हणून छत्रपती शिवाजीराजांनाच मानायला हवे. त्या अर्थाने शिवराय हे एकमेव हिंदुपदपातशहा आहेत. हिंदूंवरची सर्व आक्रमणे शिवरायांनी तलवारीच्या बळावर मोडून काढली हे सत्य अयोध्येत नरेंद्र मोदींनी स्वीकारले. म्हणूनच रामजन्मभूमीवर मंदिराचे भूमिपूजन करताना पंतप्रधान मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे मनापासून स्मरण केले, पण पंतप्रधान छत्रपती शिवरायांपुढे नतमस्तक होतात व कर्नाटकात त्यांचे कानडी मावळे रात्रीच्या अंधारात शिवरायांचा पुतळा हटवतात याचा मेळ कसा लावायचा?

पंतप्रधान मोदी यांनी अयोध्येतील भाषणात भगवान श्रीकृष्ण, छत्रपती शिवरायांचे स्मरण केले हे कर्नाटकातील शिवद्रोहींच्या कानावर गेले नाही काय? अयोध्येत श्रीरामास तंबूतून मंदिरात नेण्याचा सोहळा पार पडला, तर कर्नाटकात शिवरायांचा पुतळा चौथऱ्यावर हटवण्याचा रावणी सोहळा पार पडला. बेळगावच्या मनगुत्ती गावात जे घडले त्याचा धिक्कार सर्वत्र होत आहे.

“बचेंगे तो और भी लढेंगे”

कर्नाटक सरकारचे सीमा भागातील मराठी बांधवांशी भांडण आहेत. ते राहीलच. मराठी बांधवांवर तेथे रोजच जुलूम, अत्याचार होत आहे, पण या भांडणाचा डंख त्यांनी शिवरायांवर काढून स्वतःचेच हसे करुन घेतले. मराठी माणसांची डोकी फोडून उपयोग नाही. मरगट्टा हटत नाही, “बचेंगे तो और भी लढेंगे” म्हणत तो मैदानात दटून आहे. त्यामुळेच चिडून कर्नाटक सरकारने “जय शिवाजी, जय भवानी” घोषणांची प्रेरणा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवून टाकला. गावात वाद झाला म्हणून शिवरायांचा पुतळाच हटवणे हा मार्ग नव्हे, पण कर्नाटक सरकारने तो हटवला.

आता छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करीत बेळगावतले लोक रस्त्यांवर उतरले व त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटू लागले तेव्हा तेथील शर्कराचे डोके ठिकाणावर आले व पुतळा आठ दिवसांत पुन्हा बसवतो असे सांगितले. या सर्व प्रकरणात महाराष्ट्रातील शिवप्रेमी भाजप पुढारी तोंडी मिठाच्या गुळण्या घेऊन चिडीचूप का राहिले? एरव्ही तुम्ही शिवरायांच्या वंशजांना तुमच्या पक्षात घेता, त्यांना पदे देता, त्याचा राजकीय स्वार्थासाठी गवगवा करता. मात्र आता कर्नाटकात तेथील सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा अपमान करते तरी तुम्ही कसे राहता?

महाराष्ट्रातील भाजप ‘शिवभक्तां’चे मौन चिंताजनक

मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे मनगुत्तीप्रमाणेच शिवरायांचा पुतळा हटविण्याचा प्रकार झाला होता. तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कमलनाथ यांना थेट इशारा देत सांगितले होते की, ”छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही. मध्य प्रदेश सरकारने शिवरायांची माफी मागावी व पुतळा जेथे होता तेथेच बसवावा.” इतकेच काय, महाराष्ट्रातील काही भाजप पदाधिकारी तेव्हा शिवरायांचा अपमान झाला म्हणून छिंदवाड्यात जाऊन आंदोलन करण्याच्या तयारीत होते,

पण आता कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना ना इशारा ना धिक्कार! शिवप्रेमी जनता तर लढतेच आहे, पण या लोकांचे काय? देवेंद्रजी म्हणतात, ”जेथे मनगुत्तीत पुतळा हटवला तेथे म्हणे काँगेसचे आमदार आहेत.” आमदार कुणाचाही असू द्या, राज्यात भाजपाई येडुरप्पांचे राज्य आहे व प्रशासनाच्या हुकुमाशिवाय शिवरायांचा पुतळा हटवू शकत नाही हे महाराष्ट्रात पुण्यात दादोजी कोंडदेवांचा पुतळा रात्रीच्या अंधारात हटवताना सगळ्यांनी पाहिले. कोणत्याही पक्षाचा आमदार किंवा मुख्यमंत्री हे छत्रपती शिवरायांपेक्षा मोठे नाहीत. त्यामुळे कातडीबचाव फुटकळ खुलासे करण्यात अर्थ नाही. शिवरायांचा पुतळा रातोरात हटवण्याचा प्रकार चिंताजनक आहे. त्याहीपेक्षा महाराष्ट्रातील भाजप ‘शिवभक्तां’चे मौन चिंताजनक आहे, असे म्हणत भाजपवर ‘सामना’तून टिका करण्यात आली आहे.