‘आम्ही सर्वशक्तिमान, एकटेच लढणार अन् जिंकणार ही चंद्रकांत पाटलांची खुमखुमी जिरली’; सामनाच्या अग्रलेखातून भाजपला सणसणीत टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –    राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत भाजपला धूळ चारली आहे. यानंतर महाविकास आघाडीतील नेते व भाजप यांच्यात चांगलीच जुंपली आहे. यावरून शिवसेनेने भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. एका वर्षात दोनदा सुतक लागणे हे हिंदू शास्त्रानुसार चांगले नाही, असे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपला सणसणीत टोला लगावला आहे.

महाविकास आघाडीचे सरकार हे अनैसर्गिक आहे, त्यांना जनतेचा पाठिंबा नाही असे बोलणाऱ्यांनी शिक्षक-पदवीधरांनी दिलेल्या निकालाकडे जाड भिंगाचा चष्मा लावून पाहावे. वर्षभरापूर्वी 105 आमदार येऊनही सत्ता गेली. तेव्हापासून महाराष्ट्र भाजपला सुतक लागले. कालच्या नागपूर-पुण्यातील पराभवाने आणखी एक सुतक लागले. एका वर्षात दोनदा सुतक लागणे हे हिंदू शास्त्रानुसार चांगले नाही. भाजपला काहीतरी तोड करावीच लागेल, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. तसेच चंद्रकांतदादा म्हणतात, आम्ही एकटे लढलो म्हणून हरलो. ते खरे आहे, पण आम्ही सर्वशक्तिमान आहोत व एकटेच लढणार तसेच जिंकणार ही खुमखुमी त्यांचीच होती. ती चांगलीच जिरली असे म्हणत भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.

सामनाचा आजच्या अग्रलेखातील मुद्दे

-राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार तीनचाकी आहे, अशी टीका भाजप वर्षभर करीत होते. यावर ‘सरकारला चाके चारच आहेत, चौथे चाक जनतेच्या विश्वासाचे आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हाणला होता. तो विश्वास स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या शिक्षक, पदवीधर निवडणुकांनी खरा ठरवला आहे.

– राज्यात नुकत्याच विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणुका झाल्या. त्यातील पाच जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. धुळे-नंदुरबार विधान परिषदेची जागा काँग्रेसमधून भाजपत शिरलेल्या अमरीश पटेल यांनी जिंकली. अमरीश पटेल यांची अशा प्रकारच्या निवडणुका जिंकण्याची कार्यपद्धती किंवा कौशल्य ज्यांना माहीत आहे ते या विजयाचे श्रेय भारतीय जनता पक्षाला देणार नाहीत.

– पदवीधर, शिक्षक मतदारसंघ म्हणजे भारतीय जनता पक्षाचीच मक्तेदारी होती. शिकले-सवरलेले, सुशिक्षित, सारासार विचार करणारे मतदार हे भाजपलाच मतदान करतात, या भ्रमाचा भोपळा आता फुटला आहे. शिक्षक, पदवीधरांनी महाराष्ट्रात सर्वत्र महाविकास आघाडीलाच मतदान केले आहे.

– सगळ्यात धक्कादायक निकाल नागपूरचा आहे. गेल्या पाच दशकांपासून नागपूर पदवीधर मतदारसंघावर भारतीय जनता पक्ष विजयी होत आहे. नितीन गडकरी यांनी नागपूरच्या पदवीधरांचे प्रतिनिधित्व 25 वर्षे केले, पण त्याआधी गंगाधरपंत फडणवीस हे अत्यंत प्रामाणिक, कष्टाळू संघ नेते नागपूरकर पदवीधारकांचे नेतृत्व विधान परिषदेत करीत होते.

– सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गंगाधरपंतांचे सुपुत्र. त्यामुळे हा मतदारसंघ किती संघमय झाला होता ते कळेल. संघाचे मुख्यालय नागपुरात आहेच, पण संघ विचारी लोकांचे संघटन मजबूत असताना नागपूरचे महापौर संदीप जोशी यांना पराभव पत्करावा लागला. काँग्रेसचे अभिजित वंजारी येथे विजयी झाले, याचे आम्हाला आश्चर्य वाटत नाही.

– विधानसभा निवडणुकीतच नागपुरातील दोन जागा भाजपने गमावल्या व उरलेल्या तीन जागांवर भाजपचा निसटता विजय झाला होता. हे चित्र काय सांगते? बालेकिल्ल्यास सुरुंग लागलेच होते, आता पायाच खचला. त्यामुळे भाजपनेही फार मनास लावून घेऊ नये. अमरावती शिक्षक मतदारसंघातही भाजप मागे पडला आहे.

– औरंगाबाद (संभाजीनगर) पदवीधर मतदारसंघात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचेच सतीश चव्हाण मोठ्या मताधिक्याने जिंकले. पुण्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातही भाजपचा पराभव झाला. पुणे पदवीधरसुद्धा भाजपचाच गड होता. अनेक वेळा तेथे प्रकाश जावडेकर विजयी होत. नंतर सध्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुणे पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्व करीत होते. – पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्व करीत असतानाच ते महाराष्ट्राचे महसूलमंत्री, प्रदेशाध्यक्ष झाले. विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी कोल्हापुरातून पुण्यात आले व आता त्यांच्याच नेतृत्वाखाली पुण्याचा पदवीधर मतदारसंघ भाजपने गमावला. पुण्याच्या शिक्षक मतदारसंघातही भाजप पराभूत झाला.

– पुणे पदवीधर, शिक्षक हा तसा पांढरपेशांचा मतदारसंघ; पण बहुधा सदाशिव पेठ, कसबा पेठ, कोथरूड, नाना पेठ, डेक्कन परिसरातील मतदारांनीही चंद्रकांतदादांच्या आवाहनास झिडकारलेले दिसते. कोल्हापूर, सातारा, सांगलीचा तर प्रश्नच येत नाही, असे एकंदरीत मतदान झालेले दिसले.

– आता चंद्रकांतदादा म्हणतात, आम्ही एकटे लढलो म्हणून हरलो. ते खरे आहे, पण आम्ही सर्वशक्तिमान आहोत व एकटेच लढणार व जिंकणार ही खुमखुमी त्यांचीच होती. ती चांगलीच जिरली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेची महाविकास आघाडी एकत्र लढली यापेक्षा एकदिलाने लढली हे महत्त्वाचे. भाजप-शिवसेना एकत्र लढत होते तेव्हा शिवसेनेची टांग खेचण्यासाठी जागोजागी गुप्त बंडखोर उभे करून भाजप खेळ बिघडवत होता. आता तिघांत तसे झाले नाही. यापासून धडा घ्यायचा आहे तो भाजपने.

…पराभव भाजपसाठी ‘आत्मक्लेश’ करून घ्यावा असाच

– नागपूर व पुण्यातील भाजपचा पराभव ही बदललेल्या वादळी वाऱ्याची चाहूल आहे. वाऱ्याने एक दिशा पकडली आहे व राज्यातील साचलेला, कुजलेला पालापाचोळा उडून जाणार आहे. नागपुरातील पराभव धक्कादायक आहे, तितकाच पुण्यातील पराभवही भाजपसाठी ‘आत्मक्लेश’ करून घ्यावा असाच आहे.

– नागपुरातील विद्यमान आमदार अनिल सोले यांच्याऐवजी विद्यमान महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी दिली. आधीचे उमेदवार नितीन गडकरी यांना मानणारे होते. जोशी हे फडणवीस कंपूचे. नागपुरातील दोन कंपूत भाजप फुटला आहे हे कटुसत्य आहेच. स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल म्हणजे जनतेचा कौल नाही, अशी वचवच सुरू आहे.

.. मग ईव्हीएममधून ओरबाडलेल्या विजयास कौल म्हणायचे काय?

– लाखो शिक्षक व पदवीधरांनी दिलेले मत कौल नसेल तर मग ईव्हीएम घोटाळ्यातून ओरबाडलेल्या विजयास कौल म्हणायचे काय? पुणे व संभाजीनगरचे काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार लाखावर मतांनी जिंकले आहेत. शिक्षक मतदारसंघात पन्नास हजारांवर मतांनी जय झाला आहे. विदर्भातील विजय त्यादृष्टीने जास्त महत्त्वाचा. काँग्रेसचे सर्व गट-तट, नेते मंडळी एकत्र आल्यावर काय चमत्कार घडतो ते दिसले. या विजयातून दिल्लीतील मरगळलेल्या काँग्रेस हायकमांडनेही बोध घ्यायला हवा. भाजपचे गड एकजुटीने पाडले जाऊ शकतात. महाराष्ट्रात ते दिसले. महाराष्ट्रातील भाजप लोकांपासून, समाजातील सर्वच घटकांपासून दूर जातो आहे. पक्ष संघटना अंतर्गत कलहाने जर्जर झाली आहे.

… येथेही ‘जात’ हाच आधार मानून उमेदवाऱ्या दिल्या

राज्यातील विधान परिषेदच्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघातही ‘जात’ हाच आधार मानून उमेदवाऱ्या दिल्या. भाजपला त्याची किंमत चुकवावी लागली.

देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या हाती भाजपची सूत्रे आहेत. ही दिल्लीश्वरांची इच्छा, पण जनतेची इच्छा काय ते नागपूर, पुणे, संभाजीनगरच्या पदवीधर व शिक्षकांनी दाखवून दिले आहे.