भुजबळांना दिलेल्या धमकीवरून शिवसेनेने भाजपवर साधला निशाणा, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने सलग तिसऱ्यांदा बाजी मारली आहे. या निकालानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी ममता बॅनर्जींचा उल्लेख झाशीची राणी असा केला होता. भुजबळांच्या या विधानानंतर संतप्त झालेल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलांनी भुजबळ जामीनावर सुटले आहेत. अजून निर्दोष सिद्ध झाले नाहीत. त्यामुळे फार जोरात बोलू नका, अन्यथा फार महागात पडेल, अशी धमकीच दिली होती. दरम्यान या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे. अशा धमक्या देऊन भाजपने आपली उरली सुरली पत का घालवत आहे?, भाजप नेत्यांची मस्तवाल भाषा हे त्यांच्या बंगालमधील दारुण पराभवाचे कारण आहे. महाराष्ट्रातील सदैव गुरगुरणाऱ्या लोकांनी याचे भान ठेवले तर बरे होईल, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. तसेच भाजप महाराष्ट्रातून सत्तेबाहेर जाण्यास त्यांची असहिष्णुताच जबाबदार आहे, असा टोलाही शिवसेनेने सामनातून लगावला आहे.

भुजबळांनी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले तर त्यात काय चुकल? पाकिस्तानात सत्तापालट झाल्यानंतर देखील पंतप्रधान मोदीही पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांचे अभिनंदन करतात. हा एक राजशिष्टाचाराचा भाग आहे. पण भुजबळांनी ममतांचे अभिनंदन केल्यामुळे पाटलांना इतका राग आला की, त्यांनी भुजबळांना धमक्या अन् इशारे दिले. थोडक्यात काय तर भुजबळांनी गप्प बसावे. नाहीतर त्यांना पुन्हा तुरुगांत टाकण्याची क्षमता आपल्यात आहे, हे सुचवायचे आहे का ?, असा सवाल शिवसेनेने केला आहे. बंगालवर विजय मिळवताच महाराष्ट्राकडे फौजा वळवू असे स्वप्न काहीजण पाहत होते. पंढरपूरच्या विजयाने त्यांच्या स्वप्नांना नवे पंख फुटले असतील, पण महाराष्ट्राचे पुण्य कामी आले अन् बंगालात ममतांचा मोठा विजय झाला. त्याची आदळआपट दिल्लीपेक्षा महाराष्ट्रातच जास्त सुरू आहे. प्रकरण धमक्या अन् इशारे देण्यापर्यंत पोहोचले. महाराष्ट्रातील मंत्र्यांना-आमदारांना विरोधी पक्षाचे लोक अशाप्रकारे धमक्या देणार असतील तर मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी हा प्रकार गांभीर्याने घ्यावा, अशी मागणी सेनेने केली आहे.