शेतीच्या वादातून चुलत्याने केला दोन्ही पुतण्यांचा खोर्‍याने ठेचून खून

पोलिसनामा ऑनलाईन – शेतीच्या जुन्या वादातून चुलत्याने दोन पुतण्यांची खोर्‍याने ठेचून क्रूरपणे खून केल्याचा धक्कादायक प्रकार तुळजापूर तालुक्यात घडला आहे. गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली.

रमेश विठोबा यादव (वय 47) आणि गणेश गोविंद यादव (वय 29) अशी खून झालेल्यांची नावे आहेत. सुरेश यादव (वय 55) याने त्यांच्या डोक्यात शेतीच्या कामात वापरण्यात येणार्‍या खोर्‍याचा वापर करीत पाठीमागून डोक्यात वार करून क्रूरपणे गंभीर जखमी केले. त्यानंतर आरळी बु. येथील आरोपी सुरेश यादव आणि त्याचा मुलगा संभाजी सुरेश यादव (वय 21) हे दोघेही फरार झाले आहेत. शेतीच्या वादातून हे हत्याकांड घडले आहे. सततच्या शेतीवादाचा परिणाम दोन व्यक्तीच्या हत्या करण्यापर्यंत गेला. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, नळदुर्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक राऊत, ईटकळ दूरक्षेत्राचे सातपुते यांच्यासह गावचे पोलीस पाटील युवराज पाटील,यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पंचनामा रात्री उशिरापर्यंत सुरू होता. हत्याकांडामुळे आरळी व परिसर हादरून गेला आहे.